
शिरूर लोकसभा मतदारसंघातून ‘गायब’ खासदार मिसळ पार्टीत? आढळराव पाटलांच्या कार्यपद्धतीची पुन्हा चर्चा
रांजणी /रमेश जाधव : शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे मतदारसंघातून गायब असल्याची चर्चा रंगत असतानाच ते ‘मिसळ पार्टी’त दिसल्याची माहिती समोर आल्याने राजकीय वर्तुळात खमंग पण तितकीच संतप्त चर्चा रंगली आहे. अवकाळी पावसाने होरपळलेल्या शेतकऱ्यांकडे पाठ फिरवून खासदारांनी ‘मिसळीचा आस्वाद’ घेतल्याची टीका होत असून, “हीच का जनतेप्रती जबाबदारी?” असा थेट सवाल उपस्थित केला जात आहे.
३१ मार्च रोजी उत्तर पुणे जिल्ह्यात अवकाळी पाऊस व गारपिठीने थैमान घालत शेतीचे प्रचंड नुकसान केले. आंबेगावच्या पूर्व भागापासून शिरूरच्या पश्चिमेकडील गावांपर्यंत शेतकऱ्यांची उभी पिके जमीनदोस्त झाली. अशा बिकट परिस्थितीत शेतकऱ्यांच्या बांधावर धाव घेणे अपेक्षित असताना खासदार मात्र मतदारसंघात फिरकलेच नाहीत, अशी तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
याउलट माजी मंत्री तथा आमदार दिलीप वळसे पाटील आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी प्रशासनासह नुकसानग्रस्त भागांची पाहणी करत तातडीने पंचनाम्यांचे आदेश दिले. शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन देत दिलासा देण्याचा प्रयत्न केला. भीमाशंकर साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष देवदत्त निकम व जिल्हा परिषद उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांनीही प्रत्यक्ष भेटी देत परिस्थितीचा आढावा घेतला. मात्र खासदार कोल्हे यांची अनुपस्थिती ठळकपणे जाणवत राहिली.
लोकसभा निवडणुकीनंतर खासदारांचा मतदारसंघाशी संपर्क तुटल्याची भावना अधिकच तीव्र होत आहे. निवडणुकीपूर्वी ‘मतदारसंघ पिंजून काढणारे’ कोल्हे विजयानंतर मात्र जनतेपासून दूर गेल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. अधिवेशनाच्या कारणावर ढाल उभी केली जात असली तरी “शेतकऱ्यांच्या डोळ्यातील पाणी पुसायला वेळ नाही, पण मिसळ पार्टीला वेळ आहे?” असा संतप्त सवाल गावागावातून ऐकू येत आहे.
विशेष म्हणजे, लोकसभा निवडणुकीत कोल्हे यांच्या प्रचारासाठी झटलेल्या कार्यकर्त्यांमध्येही प्रचंड नाराजी आहे. “वापर करून विसरले” अशी उघड नाराजी व्यक्त होत असून, आगामी पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही नाराजी धोक्याची घंटा मानली जात आहे.
दरम्यान, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या कार्यपद्धतीची पुन्हा चर्चा रंगू लागली आहे. “आढळराव पाटील हे सुख-दुःखात कायम सोबत उभे राहायचे; सध्याचे खासदार मात्र दिसतच नाहीत,” अशी तुलना नागरिक करत आहेत. त्यामुळे “आढळराव पाटील यांना डावलणे ही चूक ठरली का?” हा प्रश्न आता मतदारसंघात उघडपणे विचारला जाऊ लागला आहे.
एकंदरीत, अवकाळी पावसाच्या संकटात शेतकरी हवालदिल असताना खासदारांच्या अनुपस्थितीने आणि ‘मिसळ पार्टी’च्या चर्चेने राजकारणाचा पारा चढला असून, जनतेचा रोष येत्या काळात कोणत्या दिशेने वळतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
हे सुद्धा वाचा : गॅसही संपला अन् केरोसीनही मिळेना! सामान्यांचे हाल, वितरकांमध्ये संभ्रम