
Citizens Robbed at Knifepoint Vadgaon Maval pune Crime News
Crime News : वडगाव मावळ : सतीश गाडे : तळेगाव दाभाडे व मावळ परिसरात अलिकडच्या काळात घडलेल्या दोन गंभीर गुन्ह्यांनी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सार्वजनिक ठिकाणीच गुन्हेगारांनी निर्भीडपणे कृत्ये केल्याने कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
पहिली घटना तळेगाव बस स्थानकाजवळ घडली. फिर्यादी सत्यम लक्ष्मीकांत मोरे व त्यांचा मित्र दुचाकीवरून जात असताना चार आरोपींनी त्यांना अडवले. आरोपींकडे कोयता असल्याने त्यांनी दोघांना धमकावत लोकमान्य शाळेच्या मागील निर्जन भागात नेले. तेथे फिर्यादीला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आली. मारहाणीदरम्यान आरोपींनी त्यांच्या जवळील ६ हजार रुपये रोख हिसकावले.
यानंतरही आरोपी थांबले नाहीत. त्यांनी फिर्यादीला जबरदस्तीने एटीएममध्ये नेले आणि आणखी ८ हजार रुपये काढायला भाग पाडले. अशा प्रकारे एकूण १४ हजार रुपयांची लूट करून आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. या प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करत करण आनंद घाडगे याला अटक केली असून, त्याच्या तीन साथीदारांचा शोध सुरू आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू असून, आरोपींच्या हालचालींचा मागोवा घेतला जात आहे.
हे देखील वाचा : पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या वित्त अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार; नेमकं प्रकरण काय?
दुसरी घटना उर्से टोलनाका परिसरात घडली असून ती अधिकच धक्कादायक आहे. फिर्यादी महिलेच्या भावाला – लतिकेश – बॅनर लावण्यासाठी गेले असताना काही युवकांनी त्याला अडवले. “तू माझ्या बहिणीशी का बोलतोस?” असा जाब विचारत मुख्य आरोपी कृष्णा चव्हाण याने लाकडी दांडक्याने त्याच्यावर हल्ला केला. त्यानंतर इतर आरोपींनीही लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्याला जबरदस्तीने वाहनात घालून नेले.
या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली. या प्रकरणी शिरगाव पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तातडीने तपास करून कृष्णा चंद्रभान चव्हाण, आदेश रोहीदास कारके, साहील मधुकर गायकवाड, मेघराज शंकर राऊत आणि कृष्णा वासुदेव साधु यांना अटक केली आहे. या प्रकरणात एका अल्पवयीन आरोपीचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.
दोन्ही घटनांमध्ये पोलिसांनी जलद कारवाई करत आरोपींना अटक केली असली तरी, अशा प्रकारच्या घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी अधिक प्रभावी उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे. स्थानिक नागरिकांनी रात्रीच्या वेळी पोलिस गस्त वाढवावी, संवेदनशील भागांमध्ये अधिक सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत आणि गुन्हेगारांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
हे देखील वाचा : लातूर हादरलं! 6 वर्षीय पुतण्याचा खून चुलतीनेच केला; 17 तासांत गुन्ह्याचा पर्दाफाश
पोलिसांकडूनही या घटनांची गंभीर दखल घेण्यात आली असून, गुन्हेगारांवर आळा घालण्यासाठी विशेष मोहीम राबवण्याचे संकेत देण्यात आले आहेत. नागरिकांनीही सतर्क राहून कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास त्वरित पोलिसांना कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या सलग घडलेल्या घटनांमुळे तळेगाव परिसरातील सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, प्रशासन व पोलिस यंत्रणेसमोर आव्हान उभे ठाकले आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने ठोस उपाययोजना राबविण्याची गरज व्यक्त होत आहे.