
Pune Crime : खून केल्यानंतर कोयते उगारून आरोपींची दहशत; शिवाजीनगर भागातील धक्कादायक घटना
पुणे : विश्रांतवाडी भागात पूर्ववैमनस्यातून एका तरुणाचा खून करण्यात आला. या हत्येनंतर आरोपींनी कोयते उगारून दहशत माजवल्याची घटना घडली. शिवाजीनगर रेल्वे स्थानक परिसरातील वसाहतीत ही घटना घडली. आरोपींनी नागरिकांना धमकावून घराच्या दरवाज्याची तोडफोड केली. या घटनेने एकच खळबळ उडाली.
विश्रांतवाडी भागात मध्यरात्री शिवाजीनगर रेल्वे स्थानक परिसरातील वसाहतीतील गौरव तेलंगी याच्यावर कोयत्याने वार करुन खून करण्यात आल्याची घडली होती. या प्रकरणात पोलिसांनी तौफिक शेख, राजन दोरास्वामी (दोघे रा. शिवाजीनगर रेल्वे स्थानकाजवळील वसाहत) यांच्यासह साथीदारांना अटक केली होती. तेलंगी याचा खून केल्यानंतर मध्यरात्री पसार झालेले आरोपी तौफिक, राजन आणि साथीदार शिवाजीनगर रेल्वे स्थानक परिसरातील वसाहतीत शिरले. त्यांच्याकडे कोयते होते. कोयते उगारून आरोपींनी दहशत माजवली. प्रतिस्पर्धी टोळीतील सराईतांना साथ देऊ नका. तौफिक-राजन टोळीच्या विरोधात गेल्यास जिवे मारू, अशी धमकी आरोपींनी दिली.
त्यानंतर आरोपींनी वसाहतीतील घरांच्या दरवाज्यावर कोयते आपटून दहशत माजवली. नागरिकांना शिवीगाळ करुन पसार झाले. याबाबत एका महिलेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार, तौफिक शेख, राजन दौरास्वामी यांच्यासह साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील तपास करत आहेत.
सांगलीतही भयंकर हत्याकांड
दुसरीकडे, सांगली जिल्ह्यात अवघ्या २४ तासांच्या कालावधीत तीन ठिकाणी घडलेल्या निर्घृण हत्यांनी सांगली हादरून गेली आहे. पहाटेपासून सायंकाळपर्यंत उघडपणे सांडलेल्या रक्तामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, नागरिकांमध्ये तीव्र भीती आणि संतापाची भावना निर्माण झाली आहे.
सुरक्षित कोण? नागरिकांचा संतप्त सवाल
दिवसाढवळ्या रक्तपात होत असल्याने “सामान्य माणूस सुरक्षित आहे का?” असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. किरकोळ कारणांवरून होणाऱ्या जीवघेण्या घटना आणि वाढती गुन्हेगारी यामुळे भीतीचे वातावरण पसरले असून, प्रशासनावरील विश्वास डळमळीत होत असल्याची भावना व्यक्त होत आहे. दरम्यान, परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असला तरी, या सलग हत्याकांडांचा छडा लावणे आणि नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करणे हे तपास यंत्रणांसमोरचे मोठे आव्हान ठरत आहे.