सौजन्य - नवराष्ट्र टीम
सासवड : सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीत संपूर्ण देशात आणि राज्यात गॅस सिलेंडरचा विस्कळीतपणा झाल्याने प्रत्येकजण हवालदिल झाला आहे. जो तो पर्यायी मार्गाचा विचार करत आहे. हॉटेल व्यवसाय विस्कळीत झाल्याचे दिसत असून, त्यांनीही चुली पेटविण्यास सुरुवात केली आहे. शहरी नागरिक सिलेंडर वितरकांच्या दारात रांगा लावून बसले आहेत. मात्र अशाही परिस्थितीत ग्रामीण भागात सर्रास चुली पेटल्याचे पाहायला मिळत आहे. कोणताही गाजावाजा नाही, की तक्रार नाही, गॅस मिळो अथवा न मिळो चुलीवरची भाकरीच मस्त आहे, अशी भावना आता नागरिक व्यक्त करत आहेत.
युद्धजन्य परिस्थितीत घरगुती आणि व्यावसायिक गॅस पुरवठा आणि वितरणावर मोठ्या प्रमाणात विस्कळीतपणा आला आहे. त्यामुळे सर्वत्र एकच गोंधळ उडाला आहे. त्यातही शहरी भागात गॅस व्यतिरिक्त अन्य साधने मोठ्या प्रमाणात उपलब्ध नसल्याने अशा कुटुंबियांची फारच बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. वर्षानुवर्ष सिलेंडरच्या गॅस वरती स्वयंपाक करणारे हात आता पुन्हा चुलीकडे वळली आहेत. एकंदरीतच शहरी आणि निमशहरी भागात विदारक चित्र पाहायला मिळत आहे.
सिलेंडरच्या विस्कळीतपणामुळे नागरिक चिंतेत
जवळपास एक महिन्यापासून संपूर्ण जनता सिलेंडरच्या विस्कळीतपणामुळे चिंतेत आहे. जिकडे पाहावे तिकडे सिलेंडरच्या रांगा आणि गॅसची चर्चा ऐकायला आणि पाहायला मिळत आहे. साधारणपणे एक महिन्यापूर्वी पर्यंत ग्रामीण भाग वगळता शहरी भागातील नागरिकांनी चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ येईल असे कधी पाहिले नसेल. त्यामुळे रस्त्याने जाताना चुलीवरची भाकरी, चुलीवरचे मटण असे बोर्ड दिसले की, गाडी थांबत होती. परंतु घरी जाऊन चुलीवर भाकरी करावी असा विचारही फारसे लोक करीत नव्हते.
पिढ्यानपिढ्या चुलीवरच्या स्वयंपाकाला प्राधान्य
ग्रामीण भागात मात्र पिढ्यानपिढ्या चुलीवरच्या स्वयंपाकाला प्राधान्य दिले जात आहे. चहा व इतर कामासाठी गॅसचा वापर होत असला तरी कालवण, भाकरीसाठी मात्र आजही घरोघरी चुली पाहायला मिळत आहेत. ग्रामीण भागात शेतकरी वर्ग शेतात कामाला गेल्यानंतर संध्याकाळी येताना रिकाम्या हाताने न येता कवळाभर सरपण, लाकडे घेवूनच येतो, शेतातील झाडे, झुडपे ढाळून ते वाळविणे, गोठ्यात जनावरे असल्याने शेणापासून गोवऱ्या तयार करून कलवड करणे, उन्हाळ्यात सरपण तोडून व्यवस्थित रचून ठेवणे जेणेकरून पावसाळ्यात इंधनाची अडचण होणार नाही याची काळजी घेतली जात आहे.
गावा खेड्यात चुलीवरच्या भाकरीला पसंती
एकंदरीतच काळ कितीही बदलला तरी ग्रामीण भागात आणि गावा खेड्यात मात्र चुलीवरच्या भाकरीला पसंती दिली जात आहे. पाच वर्षापूर्वी कोरोनाच्या काळातही संपूर्ण जग ठप्प झाले तरी गाव खेड्यातील शेतकरी मात्र मुक्त श्वास घेत होता. जवळपास तीच परिस्थिती आताही निर्माण झाली असली तरी ग्रामीण भागात राहून गावचे गावपण जपणारा साधा शेतकरी मात्र कोणत्याही रांगेत उभा न राहता किंवा गोंधळ न करता आपल्या पद्धतीने जीवन जगताना पाहायला मिळत आहे.






