
अजित पवारांच्या अपघाती मृत्यूनंतर अफवांचा महापूर; सोशल मीडियावर खोट्या कथांचा धुमाकूळ
चार दिवसांपासून अजित पवार जिवंत असावेत, असा सूर काही सोशल मीडिया पोस्टद्वारे व्हायरल केला जात आहे. अपघाताच्या वेळी विमानात सहा व्यक्ती होत्या, मात्र अपघातानंतर अजितदादांसह पाच जणांचे मृतदेह आढळले, तर सहावी व्यक्ती कुठे आहे? असा सवाल उपस्थित केला जात आहे. या प्रश्नाच्या नावाखाली खोट्या कथा पसरवल्या जात असून, वास्तवाशी कोणताही संबंध नसलेल्या दाव्यांना जाणीवपूर्वक हवा दिली जात आहे. राजकीय वर्तुळात सतर्क आणि कठोर निर्णयक्षम नेता म्हणून ओळख असलेल्या अजित पवार यांच्या अपघाती निधनाबाबत काही लोकांनी संशय व्यक्त केला आहे. मात्र, प्रशासनाच्या प्राथमिक तपासात ही घटना दुर्दैवी अपघात असल्याचे स्पष्ट झाले असतानाही, अफवांचे जाळे अधिकच गुंतागुंतीचे होत चालले आहे.
कुटुंबावर संशय, बदनामीचे षडयंत्र?
अजित पवार यांचा मृत्यू अपघाती नसून घातपात असल्याचा आरोप करत, एका सामाजिक कार्यकर्ता महिलेने या प्रकरणात कुटुंबातील एका व्यक्तीसह काही राजकीय नेत्यांवर संशय व्यक्त केला आहे. या आरोपामुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. अजितदादांचे समर्थक आणि कार्यकर्त्यांनी या आरोपांचा तीव्र निषेध केला असून, ही घटना मुद्दाम वेगळ्या दिशेने नेऊन कुटुंबाला बदनाम करण्याचे षडयंत्र असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. दु:खाच्या क्षणी कुटुंबावर संशयाचे सावट टाकणे हे अमानवी कृत्य असल्याचे मत कार्यकर्त्यांनी व्यक्त केले आहे.
हे सुद्धा वाचा : अजित पवारांच्या विमान अपघातावर शंका, ब्लॅकबॉक्स मधील संभाषण…; काँग्रेसचा सवाल
अफवांचे राजकारण आणि समाजाची जबाबदारी
अजित पवार यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या कार्याचा वारसा आणि योगदानावर चर्चा सुरू असताना, अफवांचे राजकारण समाजासाठी घातक ठरत आहे. अप्रमाणित माहिती, व्हायरल पोस्ट आणि भावनिक उद्रेक यामुळे सत्य बाजूला पडत असून, संशयाला महत्त्व दिले जात आहे. प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी सुरू केली असून, सत्य लवकरच समोर येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. तसेच अफवा पसरवणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर, नागरिकांनी अप्रमाणित माहितीवर विश्वास ठेवू नये, अफवांना बळी पडू नये आणि सत्य समोर येईपर्यंत संयम बाळगावा, असे आवाहन जाणकारांकडून करण्यात येत आहे.