
पुरंदरला दमदार पावसाने बळीराजा सुखावला; माऊलींच्या आगमनापूर्वीच पाण्याचा प्रश्न मिटणार
सासवड/ संभाजी महामुनी : अनेक दिवसापासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या पुरंदर तालुक्यावर अखेर वरुणराजाची कृपा झाली असून, सर्वत्र जोरदर पाऊस झाला आहे. त्यामुळे बळीराजा एकदाचा सुखावला आहे. जमिनीतील पाण्याचा निचरा होताच पाळी, पेरणीच्या कामाला वेग येईल असे वातावरण सर्वत्र आहे. तसेच जोरदार पावसामुळे काही दिवसांत पाण्याचा प्रश्न मिटण्यास मोठी मदत होईल.
यंदाच्या पावसाळ्यातील जून महिना केव्हाच संपला असून, जुलै महिन्यातील पहिला आठवडा सरला आहे. मात्र पुरंदर तालुक्यातील बहुतेक भाग अद्यापही पावसापासून वंचित असल्याने जोरदार सर्वत्र चिंतेचे वातावरण होते. तालुक्यातील सर्व धरणे, विहिरी, ओढे, नाले अद्यापही कोरडेच असून शेतातील कामेही सुरु झालेली नव्हती. तर काही तासांच्या अंतरावर संतांचे पालखी सोहळे सरू होत असल्याने वारीला जायचे कि पेरणीसाठी पावसाच्या प्रतीक्षेत थांबायचे ? अशा चिंतेत बळीराजा सापडला होता.
पावसाने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान
८ जून रोजी मृग नक्षत्र सुरु झाले. बेडूक त्याचे वाहन होते, मात्र संपूर्ण नक्षत्र कोरडेच गेले. त्यानंतर २२ जून रोजी आर्द्रा नक्षत्र सुरु झाले, या नक्षत्राचे वाहन गाढव असून २ ते ५ जुलै दरम्यान पाऊस सांगितला होता. त्यानुसार पावसास सुरुवातही झाली. मात्र पडणारा पाऊस दमदार नसून हलक्या प्रमाणात असून तालुक्यातील बहुतेक भाग अजूनही मोठ्या पावसापासून वंचित होता. मात्र नक्षत्र संपायला काही अवधी असतानाच आर्द्रा नक्षत्राने कमाल केली. सर्वत्र जोरदार मुसंडी मारत पाणीच पाणी केले. आठवड्यातील शेवटच्या दोन, तीन दिवस सलग पावसाने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळत आहे. दरम्यान पुरंदरचे कोकण समजले जाणाऱ्या भिवडी आणि काळदरी परिसरात ५९ मिमी ची नोंद झाली असून त्यापाठोपाठ वाल्हे मंडल मध्ये ५४ मिमी इतका पाऊस झाला आहे. सर्वात कमी पाऊस पूर्व भागातील कुंभारवळण २२ मिमी आणि राजेवाडी २२ मिमी इतका झाला असून या परिसरात आणखी जोरदार पावसाची गरज आहे.
पुरंदर तालुक्यातील पावसाची मंडलनिहाय आकडेवारी
सासवड ४३ मिमी, जेजुरी ३५ मिमी, राजेवाडी २२मिमी, वाल्हे ५४ मिमी, कुंभारवळण १२ मिमी, भिवडी ५९ मिमी, परिंचे ४३ मिमी, आणि शिवरी १७ मिमी. याप्रमाणे पाऊस झाला असल्याची माहिती पुरंदर तहसील कार्यालयाचे लिपिक सोमनाथ आव्हाळे यांनी दिली आहे. सोमवारी ६ जुलै रोजी पुनर्वसू ( तरणा पाऊस) नक्षत्र सुरु झाले असून, त्याचे वाहन घोडा आहे. त्यामुळे आता घोडा काय कमाल करणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.