
ढगाळ वातावरणासह पावसाची शक्यता
राज्यासह पुण्यात उन्हाचा कडाका चांगलाच वाढला
राज्यातील अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट
पुणे: गेल्या काही दिवसांपासून राज्यासह पुण्यात उन्हाचा कडाका चांगलाच वाढला होता. मात्र, शनिवारी (ता. २८) कमाल तापमान स्थिर राहिले असून, हवामानात अचानक बदल पाहायला मिळाला. तर पुढील तीन दिवस राज्याच्या विविध भागांसह पुणे जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे पुढील दोन ते तीन दिवस पुणे जिल्ह्याला ‘यलो’ अलर्ट देण्यात आला आहे.
पुणे आणि परिसरामध्ये शनिवारी सकाळी आकाश निरभ्र असल्याने उन्हाचा चटका चांगलाच जाणवत होता. मात्र, दुपारनंतर वातावरणात हळूहळू बदल झाला. दुपारी ढगाळ वातावरण आणि सोसाट्याचा वारा वाहू लागल्याने पुणेकरांना वाढत्या उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला. सायंकाळच्या सुमारास शहरात आकाश पूर्णतः ढगाळ झाले होते. शहरातील मध्यवर्ती भागामध्ये कमाल तापमान स्थिर राहून ३८ अंश सेल्सिअस इतके तर किमान तापमान २०.२ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले. तर पुढील दोन दिवसांत हवामानात फारसा बदल होणार नसल्याने कमाल आणि किमान तापमान स्थिर राहणार आहे. त्यानंतर मात्र कमाल तापमानात हळूहळू किंचित घट होण्याची शक्यता असल्याचे हवामानशास्त्र विभागाने सांगितले आहे.
Maharashtra Rain Alert: इकडे लक्ष द्या! छत्री घेऊनच निघा नाही तर…; ‘या’ भागात पावसाचा रुद्रावतार
पुणे आणि परिसरात रविवारी (ता. २८) किमान आणि कमाल तापमान स्थिर राहणार असून कमाल तापमान ३८ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २० अंश सेल्सिअस नोंदविण्यात येणार आहे. आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याची शक्यता आहे. तर सोमवारपासून (ता. ३१) कमाल तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे. कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअस तर किमान तापमान १८ अंश सेल्सिअस पर्यंत नोंदविण्यात येण्याची शक्यता आहे. आकाश मुख्यतः निरभ्र राहून दुपारी आणि सायंकाळी अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.
राज्यातील अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट
सध्या वातावरणाच्या विविध स्तरांवर पश्चिमेकडील वाऱ्यांची द्रोणीय स्थिती आहे. याशिवाय उत्तर इराण परिसरातील पश्चिमी विक्षोभ आणि आसाम, पश्चिम बंगालसह दक्षिण भारतातील चक्राकार वाऱ्यांची स्थिती अद्यापही कायम आहे. त्यामुळे वातावरणात अस्थिरता निर्माण झाली आहे. या सर्व घडामोडींमुळे राज्यात ढगाळ वातावरण व पावसाची स्थिती कायम राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
Mahabaleshwar ची थंडी उडाली दूर! अवकाळी पावसामुळे पर्यटकांची तारांबळ; वादळी वारे अन्…
परिणामी सोमवारी (ता. ३०) मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये, तर मंगळवारी (ता. ३१) कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील तुरळक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. या काळात ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता असल्याने, हवामानशास्त्र विभागाने या जिल्ह्यांना ‘यलो’ अलर्ट दिला आहे.