
राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कालपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. मुंबई, ठाणे , पालघर जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे. पालघर जिल्ह्यात शाळा, महाविद्यालये आज बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
मुंबईसह उपनगरात कालपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. जोरदार पावसाचा परिणाम मुंबईच्या वाहतुकीवरही झाल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक सखल भागात पाणी साचले आहे. त्यामुळे नागरिकांनी महत्वाचे काम असेल तरच शक्यतो घराबाहेर पडावे असे आवाहन करण्यात आले आहे. मुंबईल पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील काही तासांमध्ये मुंबईत अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
राज्यात पुढील काही तासांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. पुणे, घाटमाथ्यावर अति ते अति मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कालपासून पुणे शहरात देखील पावसाने हजेरी लावली आहे. खडकवासला धरण साखळी क्षेत्रात देखील पावसाने हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे पुणेकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. खडकवासला धरण साखळी क्षेत्र पूर्ण क्षमतेने लवकर भरल्यास पाणीकपातीपासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
Maharashtra Rain Alert: ‘आला गं बाई आला’! पुण्यासह घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढणार, २४ तासांत…
तर दुसरीकडे कोकणात देखील पावसाने धुमाकूळ घातला आहे. मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील शीळ नावाचे धरण देखील पावसामुळे पूर्ण भरल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे कोकण किनरपट्टीवर देखील येत्या काही दिवसांमध्ये प्रचंड पावसाचा इशारा देण्यात आला आहे. जून महिन्यात पाऊस कोसळला नसल्याने राज्याची चिंता वाढली होती. मात्र आता पाऊस सुरू झाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.