
ओतूर परिसरात बिबट्यांचा वावर वाढला; मागील चार महिन्यांत तब्बल 'इतके' बिबटे जेरबंद
ओतूर तसेच आजूबाजूच्या कोपरे आणि मांडवे भागात बिबट्यांचा वावर गत काही दिवसांपासून वाढल्याचे शेतकऱ्यांनी तक्रार केली आहे. विशेषतः गाढवपट परिसरात पाळीव प्राण्यांवर वारंवार हल्ले झाल्याचे समोर आले होते. शेतकऱ्यांच्या तक्रारीची दखल घेत वनविभागाने या ठिकाणी पिंजरा लावला होता. रात्री सावजाच्या शोधात आलेली ही बिबट मादी पिंजऱ्यात अडकली असल्याचे वनविभागाने स्पष्ट केले.
शेतकरी, पालकांमध्ये भीती
ओतूर परिसरातील ऊस शेती बिबट्यांसाठी आकर्षक आश्रयस्थान ठरत असल्याचे जाणवलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना रात्री पिकांना पाणी देण्यासाठी जाण्याच्या वेळेस जीवाची भिती वाटत आहे. तसेच, अंगणात खेळणाऱ्या लहान मुलांवर हल्ल्याची शक्यता पाहून पालकांमध्ये मोठा तणाव निर्माण झाला आहे. नागरिकांनी शेळ्या-मेंढ्या तसेच पाळीव कुत्र्यांच्या अकस्मात हरवणाऱ्या संरक्षणविना हालचालीबद्दल चिंता व्यक्त केली आहे.
परिसरातील बिबट्या पकडला गेला असला तरी धोका टळलेला नाही. ग्रामस्थांनी रात्रीच्या वेळी एकटे बाहेर पडणे टाळावे. बाहेर पडताना हातात बॅटरी आणि काठी ठेवावी, तसेच मोबाईलवर मोठ्या आवाजात गाणी लावावीत जेणेकरून आवाजाने बिबट्या लांब जाईल. -तेजस कांबळे, वनपरिक्षेत्र अधिकारी, ओतूर
परिसरात गस्त वाढवणार
वनविभाग या परिसरात गस्त वाढवणार असून, गरज भासल्यास आणखी काही संवेदनशील ठिकाणी पिंजरे लावले जाणार आहेत. तसेच, ‘थर्मल ड्रोन’च्या सहाय्याने बिबट्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याचा विचारही प्रशासनाकडून केला जात आहे.