
उद्योगमंत्री उदय सामंत यांची मोठी घोषणा, म्हणाले; पुढील तीन ते चार महिन्यात...
सामंत म्हणाले, “एआय विकसित करताना मानवी मेंदूची आणि उद्योगांमध्ये प्रत्यक्ष कामासाठी माणसांची गरज कायम राहणार आहे. या तंत्रज्ञानाचा रोजगारावर काय परिणाम होईल आणि त्यावर प्रतिबंधात्मक उपाय काय असावेत, याचा शासन अभ्यास करत आहे. तसेच, एआयवर आधारित विशेष शैक्षणिक अभ्यासक्रमही तयार केले जातील.”
नदी सुधार आणि सांडपाणी प्रक्रिया
पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका, पीएमआरडीए आणि पर्यावरण विभागाने एकत्रितपणे २,५०० कोटी रुपयांचा नदी सुधार आराखडा तयार केला असून, हे काम अंतिम टप्प्यात आहे, अशी माहिती उदय सामंत यांनी दिली.
प्रदूषण नियंत्रण : इंद्रायणी आणि पवना नदी शुद्धीकरण प्रकल्पाचा प्रस्ताव केंद्राकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे, असंही सामंत यांनी सांगितलं.
सीईटीपी प्रकल्प
भोसरी एमआयडीसीतील सामायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्रासाठी (CETP) नागरिकांच्या तक्रारींनंतर आता नवीन जागेचा शोध सुरू असून, महिनाभरात हा प्रश्न मार्गी लागेल, असे आश्वासन सामंत यांनी दिले.
पायाभूत सुविधा आणि अतिक्रमण निर्मूलन
हिंजवडी उड्डाणपूल
या पुलासाठी ६५० कोटी रुपये मंजूर झाले असून, टीआरडीच्या माध्यमातून जागेचा प्रश्न सुटला आहे. सध्या या प्रकल्पाचा सविस्तर अहवाल (डीपीआर) तयार करण्याचे काम सुरू आहे, असं सामंत यांनी सांगितलं.
अतिक्रमणांवर हातोडा
आचारसंहिता संपल्याने एमआयडीसी क्षेत्रातील अतिक्रमणे काढण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पुढील सहा महिन्यांत सर्व अनधिकृत बांधकामे हटवून वाहतूक कोंडी फोडण्यावर भर दिला जाईल. चाकण परिसरातील रस्ते आणि पुलांची कामे पूर्ण झाल्यावर तेथील वाहतूक समस्याही सुटेल, अशी माहिती सामंत यांनी दिली.