
100 व्या साहित्य संमेलनाची नांदी; राज्यभर 99 ठिकाणी ‘साहित्य जागर’
पुणे : आगामी १०० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची उत्सुकता वाढवणारी नांदी म्हणून राज्यभर ‘साहित्य जागर’ हा व्यापक उपक्रम राबवण्याची घोषणा करण्यात आली असून, महाराष्ट्रातील तब्बल ९९ ठिकाणी विविध साहित्यिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. राज्यभर राबवण्यात येणाऱ्या या ‘साहित्य जागर’ उपक्रमामुळे साहित्यप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
या उपक्रमाअंतर्गत फिरते पुस्तक प्रदर्शन, एकदिवसीय किंवा द्विदिवसीय संमेलने, परिसंवाद, साहित्यिकांच्या मुलाखती, अभिवाचन, वाचक मेळावे तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. १०० व्या साहित्य संमेलनापूर्वीची ही एक प्रकारे सांस्कृतिक नांदी ठरणार असून, राज्यभर वाचन संस्कृतीला चालना देण्याचा यामागील उद्देश आहे.
मसापच्या नव्या कार्यकारिणीने संमेलनाच्या तयारीला वेग दिला असून, या उपक्रमाची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. फिरत्या पुस्तक प्रदर्शनासाठी विशेष बस अधिक अद्ययावत स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मसापच्या विविध शाखांच्या माध्यमातून राज्यभर हे कार्यक्रम राबवले जाणार आहेत.
यासंदर्भात माहिती देताना मसापचे अध्यक्ष योगेश सोमण म्हणाले, “१०० व्या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने राज्यातील प्रत्येक भागात साहित्याचा उत्सव पोहोचावा, या हेतूने ‘साहित्य जागर’ ही संकल्पना राबवली जात आहे. विविध शाखांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग घ्यावा,” असे आवाहन त्यांनी केले.
दरम्यान, डिसेंबरमध्ये होणाऱ्या पुणे पुस्तक महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाचनाची आवड वाढवण्यासाठीही हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार आहे. या संदर्भात महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे यांनी सांगितले की, “फिरत्या पुस्तक प्रदर्शनाच्या माध्यमातून राज्यभर पुस्तक संस्कृतीचा प्रसार करण्यात येईल. तसेच १०० व्या साहित्य संमेलनाचा प्रचार-प्रसारही या उपक्रमातून साधला जाईल. लवकरच अधिकृत कार्यक्रम जाहीर करण्यात येईल.”