
पुणे-नाशिक रेल्वेसाठी चाकणमध्ये एल्गार; सर्वपक्षीय नेते अन् कार्यकर्ते आक्रमक
चाकण शहर : पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात चाकणमध्ये सर्वपक्षीय आंदोलनाची ठिणगी पडली आहे. पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्प पुन्हा सुरू करावा आणि रेल्वेचा मूळ, पारंपरिक व सरळ मार्ग कायम ठेवावा, या मागणीसाठी चाकण येथे सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी एकत्र येत चक्काजाम आंदोलन केले. पुणे-नाशिक दरम्यानचा प्रस्तावित रेल्वे मार्ग चाकण, राजगुरूनगर, मंचर, नारायणगाव, आळेफाटा, संगमनेर आणि सिन्नर या पारंपरिक मार्गानेच नेण्यात यावा, अशी आग्रही भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली. या मार्गामुळे उत्तर पुणे जिल्ह्यातील अनेक गावांना तसेच औद्योगिक पट्ट्याला थेट रेल्वे जोडणी मिळणार असल्याने प्रकल्पात कोणताही बदल करण्याऐवजी तांत्रिक अडचणींवर उपाय शोधण्याची मागणी करण्यात आली.
जीएमआरटीच्या सुरक्षेचा मुद्दा; पर्याय शोधण्याची मागणी
जीएमआरटी अर्थात जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोपच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पाबाबत अडचणी निर्माण झाल्या आहेत. जीएमआरटीच्या कार्यक्षमतेवर रेल्वेमुळे परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आल्याने प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे. मात्र, एका तांत्रिक अडचणीमुळे संपूर्ण प्रकल्पच रद्द करणे योग्य नाही, अशी भूमिका स्थानिक नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी मांडली. जीएमआरटीची सुरक्षा आणि कार्यक्षमता अबाधित ठेवून रेल्वे मार्ग उभारण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा, अशी मागणी करण्यात आली. एलिव्हेटेड ट्रॅक, बोगद्याचा पर्यायजीएमआरटीच्या सुरक्षेचा प्रश्न सोडविण्यासाठी एलिव्हेटेड रेल्वे मार्ग, बोगदा किंवा अन्य आधुनिक अभियांत्रिकी तंत्रज्ञानाचा वापर करता येऊ शकतो. त्यामुळे जीएमआरटीचे कामकाज सुरक्षित ठेवून रेल्वेचा मूळ मार्ग कायम ठेवण्याचा पर्याय तज्ज्ञांच्या मदतीने तपासण्यात यावा, अशी मागणी आंदोलकांनी केली.
हजारो कामगार, कर्मचारी आणि व्यावसायिक दररोज पुणे, चाकण आणि परिसरात प्रवास करतात. अशा परिस्थितीत पुणे-नाशिक रेल्वे सुरू झाल्यास कामगारांचा प्रवास, औद्योगिक वाहतूक आणि व्यवसायिक संपर्क अधिक गतिमान होण्याची शक्यता आहे. रेल्वे जोडणीमुळे उत्तर पुणे जिल्ह्यात नवीन उद्योगांना चालना मिळण्याबरोबरच रोजगाराच्या संधीही वाढू शकतात. पुणे आणि नाशिक या दोन महत्त्वाच्या शहरांशी थेट संपर्क निर्माण झाल्यास शिक्षण, व्यवसाय आणि नोकरीसाठी प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा फायदा होणार आहे.
शेतमाल वाहतुकीलाही रेल्वे प्रकल्पाचा फायदा होणार असून केवळ उद्योग क्षेत्रापुरता मर्यादित राहणार नसून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनाही होऊ शकतो. शेतमाल जलदगतीने मोठ्या बाजारपेठांपर्यंत पोहोचविण्यासाठी रेल्वे वाहतूक उपयुक्त ठरू शकते. त्यामुळे शेतमालाच्या वाहतुकीवरील वेळ आणि खर्च कमी होऊन शेतकऱ्यांना नवीन बाजारपेठा उपलब्ध होण्याची शक्यता आहे.‘प्रकल्प रद्द नको, तो मार्गी लावा’चाकणमधील आंदोलनादरम्यान “पुणे-नाशिक रेल्वे झालीच पाहिजे आणि ती सरळ मार्गानेच झाली पाहिजे” असा निर्धार व्यक्त करण्यात आला. सर्वपक्षीय नेते आणि नागरिकांनी एकत्र येत केंद्र सरकार व रेल्वे मंत्रालयाने स्थानिकांच्या मागणीचा गांभीर्याने विचार करावा, अशी मागणी केली. दरम्यान, चक्काजाम आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर चाकण पोलिसांकडून मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी परिस्थितीवर लक्ष ठेवले.
आता केंद्राच्या भूमिकेकडे लक्ष
पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पाचा प्रश्न केवळ दोन शहरांना जोडणारा नसून उत्तर पुणे जिल्ह्याच्या औद्योगिक, कृषी आणि आर्थिक विकासाशी निगडित असल्याचा दावा स्थानिकांकडून केला जात आहे. त्यामुळे जीएमआरटीच्या सुरक्षेचा प्रश्न कायम ठेवून रेल्वे प्रकल्पासाठी व्यवहार्य तांत्रिक पर्याय शोधला जाणार का, तसेच चाकणसह पारंपरिक मार्गाने प्रकल्प पुन्हा मार्गी लागणार का, याकडे आता संपूर्ण उत्तर पुणे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.