
Sahyadri Express Extension Demand
मुंबई येथील मध्ये रेल्वे कार्यालयात गुरुवारी (२३ एप्रिल) सर्व रेल्वे सल्लागार सदस्यांची बैठक पार पडली. या बैठकीत जोशी यांनी पश्चिम महाराष्ट्रीतील रेल्वे त्रुटींवर प्रशासनाचे लक्ष वेधले. यावेळी पश्चिम महाराष्ट्रातील रेल्वे कनेक्टिव्हिटी अधिक सक्षम होण्यासाठी सह्याद्री एक्सप्रेसचा विस्तार करण्याची मागणी करण्यात आली आहे.
सध्या कोल्हापूर ते पुणे या मार्गावर धावणारी सह्याद्री एक्सप्रेस केवळ पुण्यापर्यंत मर्यादित आहे. यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. कोल्हापूर, सांगली आणि सातारा परिसरातून दररोज हजारो विद्यार्थी, व्यापारी आणि कामगार रोजगासाठी मुंबईला जात असतात, मात्र पुण्यातच थांबत असल्याने प्रवाशांना उतरुन दुसरी गाडी पकडावी लागत असल्याने मोठे हाल होत आहेत. पूर्वी ही गाडी मुबईपर्यंत होती.
यामुळे प्रवाशांचा वेळ आणि पैसा दोन्हीचा अपव्यय होत आहे. जर ही गाडी थेट मुंबईपर्यंत विस्तारित करण्यात आली, तर प्रवाशांची सोयच होणार नाही, तर थेट प्रवास उपलब्ध झाल्यामुळे रेल्वेच्या उत्पन्नातही मोठी भर पडण्याची शक्यता आहे, असा विश्वास बैठकीत व्यक्त करण्यात आला. रेल्वे प्रशासनाने या विषयांची गांभीर्याने दखल कार्यवाही केले तर प्रवाशांना फायदा होईल.
दुसरीकडे, मुंबई-कोल्हापूर दरम्यान धावणाऱ्या ‘महालक्ष्मी एक्सप्रेस’ला पुणे ते सातारा या दरम्यान एकही थांबा नसल्याने या पट्ट्यातील प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. बारामती, निरा, फलटण, सासवड आणि औद्योगिक(MIDC) परिसरातील नागरिक या स्टेशनवर अवलंबून आहेत. महालक्ष्मी एक्सप्रेसला येथे थांबा मिळाल्यास उद्योजक, नोकरदार आणि शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल असे चैतन्य जोशी यांनी नमूद केले.
पश्चिम महाराष्ट्रातील प्रलंबित मागण्या पूर्ण झाल्यास रेल्वे सेवा अधिक लोकाभिमुख होई अशी आशा व्यक्त केली जात आहे. यावर आता रेल्वे प्रशासन काय निर्णय घेईल याकडे सर्वांचे लक्ष आहे.