
वाढत्या उष्णतेचा पोल्ट्री व्यवसायाला फटका, कोंबड्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले; व्यावसायिक चिंतेत
मावळ तालुक्यातील सुदुंबरे, जांबवडे, जाधववाडी तसेच खेड तालुक्यातील निघोजे, भांबोली, शिंदेवासुली, मरकळ, गोळेगाव, चरोली या परिसरात मोठ्या प्रमाणात पोल्ट्री व्यवसाय चालतो. मात्र, यंदा उन्हाची तीव्रता लवकर वाढल्याने कोंबड्यांवर उष्णतेचा ताण निर्माण झाला आहे. परिणामी, कोंबड्यांचे मृत्यू वाढले असून, जिवंत कोंबड्यांचे वजनही घटत आहे.
उष्णतेपासून संरक्षणासाठी व्यावसायिकांकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. शेडवर उसाचे पाचट टाकणे, त्यावर पाणी मारणे, स्प्रिंकलर व फॉगर प्रणालीचा वापर, फॅन बसवणे, पत्र्याच्या शेडला बारदान पोती लावणे अशा उपायांनी तापमान कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, या उपाययोजनांमुळे खर्चात मोठी वाढ होत असून, अपेक्षित परिणाम मिळत नसल्याची खंत व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे. सध्या परिसरात प्रखर उष्णतेची लाट कायम असून, उष्माघातामुळे कोंबड्यांचे मोठ्या प्रमाणात मृत्यू होत आहेत. त्यामुळे मावळ-खेड परिसरातील पोल्ट्री व्यावसायिकांची चिंता वाढली आहे.
पिल्लांनाही उष्णतेचा फटका
तालुक्यात पोल्ट्री व्यवसाय मोठ्या प्रमाणात असला तरी, उष्णतेचा सर्वाधिक परिणाम पिल्लांवर होत आहे. वाढत्या तापमानामुळे कोंबड्या कमी खाद्य घेत असल्याने त्यांचे वजन वाढ मंदावली आहे. पिल्लांना उष्णतेची झळ सहन होत नसल्याने मृत्यूदर वाढत आहे. तसेच, पाण्याचा वाढलेला वापर आणि अंडी उत्पादनात झालेली घट यामुळे व्यावसायिकांचे दररोज हजारो रुपयांचे नुकसान होत असल्याचे पोल्ट्री व्यावसायिकांनी सांगितले.