
बारामती : अमोल तोरणे
संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याने बारामतीतील मुक्काम आटोपून इंदापूर तालुक्याकडे प्रस्थान करताच भक्तिमय वातावरणात वारकरी संप्रदायाचा उत्साह शिगेला पोहोचला. काटेवाडी येथे पार पडलेल्या पारंपरिक मेंढ्यांच्या गोल रिंगणाने वारकऱ्यांचा उत्साह द्विगुणित केला, तर इंदापूर तालुक्याचे प्रवेशद्वार असलेल्या भवानीनगर येथे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते पालखीचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.
ना अपघाताची भीती, ना वेगाचं टेन्शन! ‘या’ रेल्वेमार्गावर स्वदेशी ‘कवच’ प्रणाली; सुरक्षा अधिक भक्कम
पालखी सोहळा मोतीबाग, बांदलवाडी व पिंपळी-लिमटेक मार्गे काटेवाडीत दाखल होताच राष्ट्रवादी युवक नेते जय पवार, सरपंच मंदाकिनी भिसे, उपसरपंच मिलिंद काटे, छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष प्रशांत काटे, संचालक अनिल काटे, माजी जिल्हा परिषद सदस्य के. टी. जाधव, पांडुरंग कचरे आदी मान्यवरांनी स्वागत केले. यावेळी जय पवार यांनी पालखीचे सारथ्य केले.
काटेवाडीत परीट समाजाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे धोतरांच्या पायघड्या अंथरून पालखीचे स्वागत करण्याची परंपरा यंदाही जपण्यात आली. हनुमान मंदिर परिसरात पालखी विसावल्यानंतर दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. यानंतर काटेवाडी बसस्थानकाजवळ संत तुकाराम महाराज पालखी महामार्गावर माने, काळे व मासाळ परिवाराच्या वतीने आयोजित मेंढ्यांचे पारंपरिक गोल रिंगण उत्साहात पार पडले. टाळकरी, मृदुंगधारक आणि तुळशी वृंदावन डोक्यावर घेतलेल्या महिला वारकऱ्यांनी प्रदक्षिणा पूर्ण केल्यानंतर मेंढ्यांनी पालखीभोवती गोल रिंगण घालत अनोखी परंपरा जिवंत ठेवली. हा देखावा पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.
दरम्यान, पालखी सोहळा भवानीनगर येथे दाखल होताच कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पालखीचे स्वागत करून सारथ्य केले. छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक, उपाध्यक्ष शिवाजीराव निंबाळकर, सरपंच यशवंत पाटील तसेच संचालक व मान्यवरांनीही पालखीचे स्वागत केले.
कारखान्याच्या कार्यस्थळावर पालखी विसावल्यानंतर संचालक निलेश टिळेकर व रश्मी टिळेकर यांच्या हस्ते महाआरती व महापूजा करण्यात आली. प्रशासनाच्या वतीने तहसीलदार जीवन बनसोडे, पंचायत समितीचे सभापती हर्षवर्धन लोंढे आणि गटविकास अधिकारी सचिन खुडे यांनी पालखीचे स्वागत केले. त्यानंतर पालखी सोहळा सणसर मुक्कामी रवाना झाला. सणसर ग्रामस्थांनीही उत्स्फूर्त स्वागत करून वारकऱ्यांच्या सेवेत सहभाग नोंदविला.
काटेवाडी येथील उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या निवासस्थानी वारकऱ्यांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले. उपमुख्यमंत्री पवार यांनी स्वतः वारकऱ्यांना भोजन वाढून सेवाभाव जपला. तसेच सकाळी पालखी स्थळाची पाहणी करून नियोजनाबाबत पदाधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.
Pune Metro line 3: हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो कधी सुरू होणार? उद्घाटनाचा पुन्हा नवा मुहूर्त