
मुळा–मुठा नदीत कचरा टाकण्याविरोधात एल्गार; कचऱ्याच्या गाड्या अडवून विद्यार्थ्यांचे आंदोलन
कदमवाकवस्ती : पुणे शहराची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या मुळा–मुठा नदी पात्रात बेकायदेशीरपणे टाकल्या जाणाऱ्या कचऱ्याविरोधात विद्यार्थ्यांचा संताप पुन्हा एकदा उफाळून आला आहे. लोणी-काळभोर, कदमवाकवस्ती ग्रामपंचायतींसह परिसरातील काही गावांकडून दररोज ३५ ते ४० ट्रॅक्टरद्वारे कचरा थेट नदीपात्रात टाकला जात असल्याच्या निषेधार्थ एमआयटी एडीटी विद्यापीठ येथील सुमारे सहा हजार विद्यार्थ्यांनी ‘कचरा बंद’ आंदोलन पुन्हा सुरू केले आहे. सात दिवसांची मुदत संपल्यानंतरही कचरा टाकण्याचा प्रकार सुरूच राहिल्याने संतप्त विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर कचऱ्याच्या गाड्या अडवून तीव्र आंदोलन छेडले आहे.
पर्यावरण आणि सार्वजनिक आरोग्यास गंभीर धोका निर्माण करणाऱ्या या प्रकाराविरोधात विद्यार्थ्यांनी गत आठवड्यात, ४ मार्च रोजी विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारावर आंदोलन करत ग्रामपंचायतींच्या कचरा वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरांना कॅम्पसमधून नदीपात्राकडे जाण्यास मज्जाव केला होता. त्यावेळी परिस्थिती तणावपूर्ण झाल्याने डॉ. राजकुमार शिंदे, पोलिस उपायुक्त (झोन-६, पुणे शहर) यांनी मध्यस्थी करून विद्यार्थ्यांशी चर्चा केली होती. त्यावेळी विद्यार्थ्यांनी संबंधित ग्रामपंचायतींना कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न सोडवण्यासाठी सात दिवसांची मुदत दिली होती. मात्र, ही मुदत संपूनही नदीपात्रात कचरा टाकण्याचा प्रकार सुरूच राहिल्याने विद्यार्थ्यांनी पुन्हा आंदोलन तीव्र केले आहे.
विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर कचऱ्याच्या गाड्या थांबवत निषेध व्यक्त केला असून, जोपर्यंत नदीपात्रात कचरा टाकणे पूर्णपणे बंद होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असा इशारा प्रशासनाला दिला आहे. या आंदोलनाला अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (एबीव्हीपी) यांनीही जाहीर पाठिंबा देत विद्यार्थ्यांसोबत आंदोलनात सहभाग नोंदवला आहे. स्थानिक ग्रामपंचायती आणि विद्यार्थ्यांमध्ये वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
दरम्यान, २६ फेब्रुवारी रोजी नदीपात्रात साचलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यांना भीषण आग लागल्याने हा प्रश्न अधिकच गंभीर बनला होता. सलग चार दिवस ही आग धुमसत राहिल्याने परिसरात विषारी धूर पसरला होता. परिणामी विद्यापीठातील सहा ते सात विद्यार्थ्यांना श्वसनाचा त्रास आणि गुदमरल्याची लक्षणे जाणवू लागल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करावे लागले होते. या घटनेमुळे विद्यार्थ्यांमध्ये संताप आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले.
या घटनेनंतर प्रशासनानेही या प्रश्नाची दखल घेतली होती. हवेलीचे उपविभागीय अधिकारी यशवंत माने, लोणी-काळभोरचे अप्पर तहसीलदार तृप्ती कोलते, तसेच संबंधित ग्रामपंचायतींचे माजी सरपंच आणि ग्रामसेवक यांनी नदीपात्रातील कचऱ्याच्या जागेची पाहणी केली होती. मात्र, या गंभीर प्रश्नावर अद्याप कोणताही ठोस तोडगा निघालेला नसल्याने नदीपात्रातील कचऱ्याचा प्रश्न अधिकच जटिल बनला आहे.
विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार दररोज सुमारे ७० टन कचरा थेट नदीपात्रात टाकला जात आहे. या कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरते, वारंवार आग लागण्याच्या घटना घडतात आणि त्यातून निर्माण होणाऱ्या विषारी धुरामुळे विद्यार्थ्यांसह परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे सात दिवसांच्या मुदतीनंतर विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा कचरा वाहतूक रोखण्याचा निर्णय घेतला आहे.
विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी घातक
विद्यार्थी दादासाहेब भोसूरे यांनी सांगितले की, नदीपात्रात कचरा टाकणे तातडीने बंद करणे आवश्यक आहे. हा प्रकार विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी अत्यंत घातक असून प्रशासनाने तातडीने पर्यायी व्यवस्था करावी.
कचरा नदीपात्रात टाकू देणार नाही
विद्यार्थिनी मुग्धा सोनवणे यांनी सांगितले की, दररोज सुमारे ७० टन कचरा नदीत टाकला जात असल्यामुळे दुर्गंधी, धूर आणि प्रदूषण वाढत आहे. त्यामुळे आम्ही बाहेरून येणारा कचरा नदीपात्रात टाकू देणार नाही, अशी ठाम भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली आहे.
पर्यायी जागेवर तातडीने कचऱ्याची विल्हेवाट लावावी
एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष डॉ. मंगेश कराड यांनी सांगितले की, विद्यापीठाने नेहमीच स्थानिक ग्रामपंचायतींना सहकार्याची भूमिका घेतली आहे. मात्र, नदीपात्रात कचरा टाकणे अत्यंत चुकीचे असून त्यामुळे परिसरात जल आणि वायू प्रदूषण प्रचंड वाढले आहे. कचऱ्यामुळे नदीचे अस्तित्व, विद्यार्थ्यांचे आणि परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यापूर्वी स्थानिक ग्रामपंचायतींनी गाव गायरानातील गट क्रमांक २०३१ मधील दोन एकर जागा कचरा प्रकल्पासाठी मिळावी, अशी मागणी जिल्हा प्रशासनाकडे केली होती. मात्र, सध्याच्या ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी पुन्हा नदीपात्रातच कचरा टाकण्याची भूमिका घेतल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींनी सामंजस्याची भूमिका घेत पर्यायी जागेवर तातडीने कचऱ्याची विल्हेवाट लावावी, अशी विनंती त्यांनी केली.