
पुणे शहर परिसरात तापमानात वाढ
मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच उष्णतेचा कडाका
तापमानात वाढ होण्याची शक्यता
पुणे: पुणे शहर आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून तापमानात मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे. नागरिकांना आतापासूनच उन्हाच्या तीव्र झळा सोसाव्या लागत आहेत. बहुतांश भागात पारा ३५ अंशांच्या पुढे गेला असून मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच उन्हाचा कडाका वाढला आहे.
गेल्या काही दिवसांपासून पुणे शहर आणि परिसरात वाढत असलेल्या उष्णतेमुळे उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. मार्चच्या सुरुवातीलाच सलग चार दिवस कमाल तापमानाने पस्तीशी ओलांडली आहे. पुढील काही दिवसांत तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
शहर आणि परिसरात शुक्रवारी (ता.६) १५.८ अंश सेल्सिअस इतके किमान तापमान तर ३७ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदविण्यात आले. आकाश मुख्यतः निरभ्र होते. तापमानामध्ये वाढ झाली असल्याने दुपारी पुणेकरांना उकाड्याचा सामना करावा लागत आहे. पुणे आणि परिसरात शनिवार (ता.७) किमान तापमानात किंचित वाढ होण्याची शक्यता आहे.
तर कमाल तापमान स्थिर राहण्याची शक्यता आहे. कमाल तापमान ३७ अंश सेल्सिअस तर १६ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदविण्यात येणार आहे. आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याची शक्यता आहे.तसेच रविवारपासून (ता. ८) कमाल आणि किमान अशा दोन्ही तापमानात वाढ होऊन ते ३९ अंश सेल्सिअस इतके नोंदवले जाण्याची शक्यता असल्याचे भारतीय हवामान विभागाने वर्तवले आहे.
पुणेकरांनो सनस्क्रीन, सनकोट विकत घ्या! तापमानात सातत्याने वाढ; पारा ३५ अंशांच्या पुढे
शेतीपिकांसह आरोग्यावर होणार गंभीर परिणाम?
अचानक वाढलेल्या तापमानामुळे गहू, हरभरा, कांदा, भाजीपाला यांसारख्या रब्बी पिकांवर ताण येत आहे. पिकांची वाढ खुंटणे, दाणे भरण्याची प्रक्रिया अपूर्ण राहणे, त्यामुळे उत्पादनात घट येऊ शकते. फुलगळ व पानगळ वाढणे, उष्णतेमुळे जमिनीतील आर्द्रता झपाट्याने कमी होत असून, शेतकऱ्यांना पिकांना अतिरिक्त पाणी द्यावे लागत आहे. त्यामुळे वीज वापर आणि इतर खर्च वाढत आहे. उन्हामुळे कुरणातील गवत लवकर वाळत आहे. हिरवा चारा कमी उपलब्ध होत असल्याने पशुपालकांना सुक्या चाऱ्यावर अवलंबून राहावे लागत आहे. दुधाळ जनावरांचे दूध उत्पादन घटणे, जनावरांमध्ये अशक्तपणा, उष्माघाताचा धोका ही होण्याची शक्यता जाणकारांमधून व्यक्त होत आहे.
मार्चच्या सुरुवातीलाच उन्हाचा तीव्र चटका; शेतीपिकांसह आरोग्यावर होणार गंभीर परिणाम?
दरम्यान, अनेक ठिकाणी तलाव, विहिरी आणि बोअरवेलमधील पाण्याची पातळी कमी होऊ लागली आहे. ग्रामीण भागात टँकरची मागणी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. पाणीटंचाई तीव्र होण्याची चिन्हे आत्ताच दिसत असून, पाण्यासाठी नागरिकांची धावपळ होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. शेतीसाठी पाणी सिंचनावर देखील मर्यादा पडण्याची शक्यता आहे.