
मार्चच्या सुरुवातीलाच उन्हाचा चटका, चारा अन् पाण्याची समस्या; नागरिकांच्या आरोग्यावरही गंभीर परिणाम
अचानक वाढलेल्या तापमानामुळे गहू, हरभरा, कांदा, भाजीपाला यांसारख्या रब्बी पिकांवर ताण येत आहे. पिकांची वाढ खुंटणे, दाणे भरण्याची प्रक्रिया अपूर्ण राहणे, त्यामुळे उत्पादनात घट येऊ शकते. फुलगळ व पानगळ वाढणे उष्णतेमुळे जमिनीतील आर्द्रता झपाट्याने कमी होत आहे. शेतकऱ्यांना पिकांना अतिरिक्त पाणी द्यावे लागत आहे. त्यामुळे वीज वापर आणि इतर खर्च वाढत आहे.
उन्हामुळे कुरणातील गवत लवकर वाळत आहे. हिरवा चारा कमी उपलब्ध होत असल्याने पशुपालकांना सुक्या चाऱ्यावर अवलंबून राहावे लागत आहे. दुधाळ जनावरांचे दूध उत्पादन घटणे, जनावरांमध्ये अशक्तपणा, उष्माघाताचा धोका ही होण्याची शक्यता जाणकारांमधून व्यक्त होत आहे. अनेक ठिकाणी तलाव, विहिरी आणि बोअरवेलमधील पाण्याची पातळी कमी होऊ लागली आहे. ग्रामीण भागात टँकरची मागणी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. पाणीटंचाई तीव्र होण्याची चिन्हे आत्ताच दिसत आहेत. पाण्यासाठी नागरिकांची धावपळ होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. शेतीसाठी पाणी सिंचनावर देखील मर्यादा पडण्याची शक्यता आहे.
नागरिकांच्या आरोग्यावर होऊ शकतो परिणाम
मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच उन्हाच्या वाढत्या तीव्रतेमुळे उष्माघात, डिहायड्रेशन, डोकेदुखी, त्वचारोग, रक्तदाबातील चढउतार यांसारख्या तक्रारी वाढू शकतात. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि श्रमिक वर्ग यांनी विशेष काळजी घेणे गरजेचे ठरणार आहे. त्या करीता दुपारी १२ ते ४ या वेळेत उन्हात जाणे टाळावे, भरपूर पाणी व द्रवपदार्थ घ्यावेत, डोक्यावर टोपी/रुमाल वापरावा, जनावरांना सावली व स्वच्छ पाणी उपलब्ध करून द्यावे.
प्रशासनाकडून अपेक्षित उपाययोजनांची गरज
सुरु असलेल्या कडक उन्हाच्या पार्श्वभूमीवर पाणीपुरवठ्याचे योग्य ते नियोजन, प्रसंगी जनावरांसाठी चारा छावण्यांची तयारी, आरोग्य शिबिरे, शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन व मदत मिळणे गरजेचे असेल. मार्चच्या सुरुवातीलाच वाढलेली उष्णता ही आगामी एप्रिल–मे महिन्यात अधिक तीव्र होण्याची शक्यता दर्शवित आहे. त्यामुळे प्रशासन, शेतकरी आणि नागरिकांनी आतापासूनच दक्षता घेणे आवश्यक ठरत आहे.