
डिजिटल युगात वाचन संस्कृतीसमोर मोठे आव्हान; मोबाईल-आधारित माहितीमुळे सखोल वाचन घटले
पुणे/गायत्री पवळे : एकेकाळी घराघरांत वर्तमानपत्र, साप्ताहिके, कादंबऱ्या, चरित्रग्रंथ आणि बालसाहित्य यांचे वाचन हे दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग मानले जात होते. सकाळच्या चहासोबत वर्तमानपत्र वाचणे, दुपारच्या निवांत वेळेत पुस्तकांचा आस्वाद घेणे आणि सुट्टीच्या दिवशी ग्रंथालयाला भेट देणे, अशी समृद्ध वाचन परंपरा महाराष्ट्रात खोलवर रुजलेली होती. मात्र, गेल्या काही वर्षांत डिजिटल माध्यमांच्या झपाट्याने वाढलेल्या प्रभावामुळे या वाचन संस्कृतीसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
आजची तरुण पिढी माहिती मिळवण्यासाठी पारंपरिक पुस्तकांपेक्षा मोबाईल, सोशल मीडिया, यूट्यूब, रील्स यांसारख्या डिजिटल माध्यमांवर अधिक अवलंबून राहू लागली आहे. काही सेकंदांत उपलब्ध होणारी माहिती, आकर्षक दृश्यरचना आणि त्वरित मनोरंजन यामुळे सखोल वाचनाकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र दिसत आहे. परिणामी, चिंतनशील वाचन, विचारांची खोली आणि भाषिक समृद्धी यांवर परिणाम होत असल्याची चिंता शिक्षक व साहित्यिक व्यक्त करत आहेत.
…तर वाचन संस्कृतीशी पुन्हा जोडणे शक्य
विशेषतः विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासक्रमापुरतेच वाचन मर्यादित राहू लागल्याचे आढळते. स्पर्धा परीक्षा, शैक्षणिक प्रकल्प आणि अभ्यासासाठी आवश्यक संदर्भ शोधले जातात; मात्र कथा, कविता, निबंध, इतिहास, विज्ञान आणि आत्मचरित्रात्मक साहित्य वाचण्याची सवय कमी होत आहे. यामुळे भाषेवरील पकड, कल्पनाशक्ती, संवेदनशीलता आणि सामाजिक जाणीव यांनाही फटका बसत असल्याचे स्पष्ट होत आहे. तथापि, डिजिटल माध्यमे ही केवळ धोका नसून, एक संधीही ठरू शकतात, असे मत तज्ज्ञ मांडतात. ई-बुक्स, ऑडिओबुक्स, ऑनलाइन ग्रंथालये, साहित्यविषयक पॉडकास्ट आणि लेखकांशी संवाद यांसारख्या नव्या माध्यमांमुळे वाचनाची नवी दारे खुली झाली आहेत. त्यामुळे समस्या डिजिटल माध्यमांची नसून त्यांचा वापर कसा केला जातो, हा अधिक महत्त्वाचा मुद्दा ठरतो. योग्य मार्गदर्शन मिळाल्यास तरुण पिढीला वाचन संस्कृतीशी पुन्हा जोडणे शक्य आहे.
‘दररोज थोडे वाचन’ उपक्रमाची गरज
वाचनाची आवड वाढवण्यासाठी शाळा, महाविद्यालये, पालक आणि सामाजिक संस्थांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. वाचन स्पर्धा, पुस्तक प्रदर्शन, कथाकथन सत्रे, लेखक भेट, परिसरातील ग्रंथालयांची उभारणी तसेच ‘दररोज थोडे वाचन’ अशा उपक्रमांद्वारे वाचन संस्कृतीला चालना देता येऊ शकते. डिजिटल युग कितीही वेगाने पुढे गेले, तरी विचारांना खोली देणारे, मनाला संवेदनशील बनवणारे आणि समाजाला दिशा देणारे माध्यम म्हणून पुस्तकांचे महत्त्व अबाधित राहणार आहे. त्यामुळे बदलत्या काळात वाचन संस्कृती जपणे ही केवळ सांस्कृतिक नव्हे, तर सामाजिक जबाबदारी ठरत आहे.
“डिजिटल माध्यमांमुळे विद्यार्थ्यांचा संयम कमी होत चालला आहे. ३० सेकंदांची रील पाहणे एवढाच संयम उरला आहे. वाचनाची सवय पालकांपासूनच सुरू झाली, तर ती तरुण पिढीत रुजेल. केवळ अभ्यासापुरते वाचन न करता अवांतर वाचनही तितकेच महत्त्वाचे आहे. वाचन संस्कृती जपण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांइतकीच पालक आणि शिक्षकांचीही आहे.” -सचिन तांबे (इतिहास शिक्षक, स.प. महाविद्यालय)