
लागाचा घाट बनला मृत्यूचा सापळा, प्रवाशांचा जीव टांगणीला; सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष
ओतूर/मनोहर हिंगणे : पुणे आणि अहिल्यानगर या दोन जिल्ह्यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा असलेल्या ओतूर-ब्राम्हणवाडा जिल्हा मार्गावरील ‘लागाचा घाट’ सध्या मृत्यूचा सापळा बनला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून या घाटातील रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ‘अक्षम्य दुर्लक्षामुळे’ वाहनचालकांना नाहक त्रास सोसावा लागत आहे. रस्त्याची दुरवस्था आणि या भागात असलेला बिबट्यांचा वावर यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला असून, तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
आंबेगव्हाण फाटा ते जुन्नर तालुक्याच्या हद्दी पर्यंतचा संपूर्ण घाट रस्ता पूर्णपणे उखडला आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठ्या व्यासाचे खड्डे पडले असून, आतील खडी वर आल्यामुळे दुचाकी व चारचाकी वाहने घसरण्याचे प्रमाण वाढले आहे. अनेकदा वाहने या खड्ड्यात आदळून नादुरुस्त होत आहेत, ज्यामुळे प्रवाशांना तासनतास घाटात अडकून पडावे लागत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केल्याने स्थानिकांमध्ये प्रशासनाविरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
बिबट्या प्रवण क्षेत्रामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण
लागाचा घाट हा घनदाट जंगलाने व्यापलेला असून हा परिसर ‘बिबट्या प्रवण क्षेत्र’ म्हणून ओळखला जातो. दिवसा आणि रात्रीही येथे बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणात असतो. खराब रस्त्यामुळे रात्रीच्या वेळी एखादे वाहन नादुरुस्त झाल्यास, मदतीसाठी कोणीही उपलब्ध नसते. अशा परिस्थितीत प्रवाशांना जीव मुठीत धरून अंधारात थांबवे लागते. वाहनांच्या हेडलाईटच्या प्रकाशातही खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने अपघाताची भीती कायम असते. रस्त्याच्या नूतनीकरणासाठी स्थानिक नागरिकांनी आता आक्रमक भूमिका घेतली आहे. रोहकडीचे माजी सरपंच सचिन घोलप, सुदाम घोलप, सुनीता घोलप, आंबेगव्हाणचे उपसरपंच राजेंद्र गायकर, माजी सरपंच निवृत्ती धराडे, दत्तात्रय गवांदे, सोसायटी चेअरमन वैभव हिंगणे, संजय मुरादे,सामाजिक कार्यकर्ते वाय. जी. गायकर, प्रकाश हिंगणे,निलेश महाले, पांडू गवांदे तसेच लहित खुर्दचे माजी सरपंच डॉ. सुभाष गोडसे आणि सुरेखा गोडसे यांनी प्रशासनाकडे या रस्त्याच्या तातडीच्या दुरुस्तीची मागणी केली आहे.
नूतनीकरण करणे आता क्रमप्राप्त
“हा रस्ता दोन जिल्ह्यांना जोडणारा मुख्य मार्ग आहे. मात्र, प्रशासनाला यातील खड्डे दिसत नाहीत का? एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच बांधकाम विभाग जागा होणार का?” असा संतप्त सवाल स्थानिक ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. गेल्या काही महिन्यांपासून या मार्गाची स्थिती दयनीय झाली असतानाही संबंधित विभागाने कोणतीही ठोस कार्यवाही केलेली नाही. केवळ मलमपट्टी न करता, या घाट रस्त्याचे पूर्णतः नूतनीकरण करणे आता क्रमप्राप्त झाले आहे. पावसाळा जवळ येण्यापूर्वी जर या रस्त्याचे काम झाले नाही, तर हा मार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. संभाव्य जीवितहानी टाळण्यासाठी आणि वाहनचालकांच्या सुरक्षिततेसाठी शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आता जोर धरत आहे.