
प्रचार संपल्यानंतरही छुप्या हालचाली; आचारसंहितेच्या पालनावर प्रश्नचिन्ह
पक्षांकडून करण्यात येणाऱ्या आरोपांनुसार, थेट प्रचार न करता ‘वैयक्तिक भेटी’, ओळखीच्या माध्यमातून संपर्क, तसेच मतदानाबाबत सूचक संवाद साधला जात आहे. काही ठिकाणी प्रचार साहित्य वेळेत हटवण्यात आले नसल्याचा आरोप होत असून, वाहनांवरील झेंडे, फलक आणि स्टिकर्स प्रचारमुदत संपल्यानंतरही दिसून आल्याचे सांगितले जात आहे.
डिजिटल माध्यमांच्या वापराबाबतही आरोपांची धार कायम आहे. प्रचारबंदी लागू झाल्यानंतरही खासगी संदेश, व्हॉइस मेसेज, तसेच मर्यादित गटांमध्ये फिरणाऱ्या संदेशांद्वारे अप्रत्यक्ष प्रचार सुरू असल्याचा आरोप पक्षांकडून केला जात आहे. अधिकृत प्रचार थांबला असला तरी भावनिक आवाहनांच्या माध्यमातून मतदारांची मते प्रभावित करण्याचा प्रयत्न होत असल्याचे सांगण्यात येत आहे.
या पार्श्वभूमीवर आचारसंहितेच्या अंमलबजावणीबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. प्रचार थांबल्यानंतरही अशा प्रकारच्या हालचाली सुरू राहतात, हे लोकशाही प्रक्रियेसाठी चिंताजनक असल्याचा सूर राजकीय वर्तुळातून उमटत आहे. सर्व पक्षांसाठी समान नियम असताना त्यांची काटेकोर अंमलबजावणी होणे अपेक्षित असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
निवडणूक ही स्पर्धा असली तरी ती नियमांच्या चौकटीत पार पडली पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. प्रचारबंदीच्या कालावधीत छुप्या प्रचाराचे आरोप सुरू राहणे हे निवडणूक प्रक्रियेच्या विश्वासार्हतेवर परिणाम करणारे ठरू शकते. त्यामुळे आचारसंहितेचे पालन सुनिश्चित करण्यासाठी प्रशासनाने अधिक दक्षता घ्यावी, अशी मागणी राजकीय वर्तुळातून होत आहे.
हे सुद्धा वाचा : कामाचा माणूस ते भावनिक प्रचार…; जिल्हा परिषद निवडणुकीत प्रचाराचा रोख बदलला
खेड तालुक्यात मतदार सजग
खेड तालुक्यात सुरू असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदारांमध्ये स्पष्ट बदल जाणवू लागला आहे. जनतेशी कोणतीही नाळ नसलेले व विकासाचा ठोस आराखडा नसलेले काही धनदांडगे उमेदवार पैशांच्या जोरावर निवडून येण्याचा प्रयत्न करीत असले, तरी मतदार अशा प्रवृत्तींना नाकारण्याच्या भूमिकेत असल्याचे चित्र दिसत आहे.