
नुकसान भरपाईसाठी कदमवाकवस्तीतील ग्रामस्थ संतप्त; आजपासून आमरण उपोषणाचा इशारा
कदमवाकवस्ती : कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीत १४ सप्टेंबर २०२५ रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या नागरिक आणि शेतकऱ्यांना अद्यापही शासनाकडून नुकसान भरपाई मिळालेली नसल्याने परिसरात तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. यासंदर्भात ग्रामपंचायत सदस्या राजश्री काळभोर यांनी जिल्हाधिकारी, पुणे यांना सविस्तर निवेदन देत संबंधित अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणावर गंभीर आरोप केले असून, प्रशासनाने तातडीने दखल न घेतल्यास सोमवार (दि.१३) पासून अप्पर तहसील कार्यालय लोणी काळभोर समोर बेमुदत आमरण उपोषण छेडण्याचा इशारा दिला आहे.
निवेदनानुसार, सप्टेंबर २०२५ मध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे कदमवाकवस्ती परिसरातील अनेक घरांमध्ये पाणी शिरले होते. या पाण्यामुळे नागरिकांच्या घरातील अन्नधान्य, कपडे, फर्निचर तसेच इतर जीवनावश्यक वस्तूंचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अनेक कुटुंबांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले होते. या घटनेनंतर ग्रामपंचायतीकडून शासनाच्या सूचनांनुसार तत्काळ पंचनामे करण्यात आले आणि ते वेळेत ग्राम महसूल अधिकारी कदमवाकवस्ती यांच्या कार्यालयात सादर करण्यात आले होते.
मात्र, त्यानंतरच्या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर त्रुटी झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. अंतिम नुकसानग्रस्तांच्या यादीत अनेक पात्र नागरिकांची नावे वगळण्यात आली, तर काही पंचनामे जाणूनबुजून वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवलेच गेले नाहीत, असा गंभीर आरोप निवेदनात करण्यात आला आहे. परिणामी, प्रत्यक्षात नुकसान सहन केलेल्या अनेक नागरिकांना आणि शेतकऱ्यांना आजपर्यंत कोणतीही आर्थिक मदत मिळालेली नाही. याबाबत संबंधित ग्राम महसूल अधिकारी आणि मंडळ अधिकाऱ्यांनी निष्काळजीपणा केल्याचा ठपका ठेवत त्यांच्या कामकाजाची सखोल चौकशी करून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. तसेच सर्व पात्र नुकसानग्रस्तांची पुनर्तपासणी करून त्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी ठाम भूमिका ग्रामपंचायत सदस्यांनी मांडली आहे.
आंदोलनामुळे प्रशासनावर दबाव वाढण्याची शक्यता
दरम्यान, प्रशासनाने या प्रकरणाकडे तातडीने लक्ष न दिल्यास १३ एप्रिल २०२६ पासून अप्पर तहसील कार्यालय लोणी काळभोर समोर बेमुदत आमरण उपोषण करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. या आंदोलनामुळे प्रशासनावर दबाव वाढण्याची शक्यता असून, स्थानिक नागरिकांचे लक्ष या प्रश्नाकडे लागले आहे. या निवेदनाच्या प्रती उपविभागीय अधिकारी, तहसीलदार लोणी काळभोर तसेच लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांनाही देण्यात आल्या असून, आता प्रशासन यावर काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.