मुंबई/ सोलापूर : बालभारतीकडून यंदाच्या वर्षी पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना एकात्मिक योजनेतंर्गत पाठ्यपुस्तके देण्यात आली आहेत. मात्र या नव्या पाठ्यपुस्तकातून क्यूआर कोडच गायब झाले आहेत. २०१६ पासून बालभारतीने पाठ्यपुस्तकात धड्याखाली क्यूआर कोड छापण्यास सुरूवात केली. त्यामुळे प्रत्येक धड्याचा डिजीटल कंटेट उपलब्ध होऊन विद्यार्थ्यांचे शिक्षण अधिक आकर्षणाचे बनले होते. यंदा मात्र पाठ्यपुस्तकांमध्ये वह्याची पाने जोडण्याच्या नादात क्यूआर कोड छापण्याचा बालभारतीला विसर पडला असल्याचे बाेलले जात आहे. तर दुसरीकडे, डिजीटल इंडियाचा मोठा गाजावाजा सुरू असताना शालेय शिक्षण विभागाने मात्र पुस्तकांच्या डिजीटल स्वरुपालाचा बगल दिली की काय अशी जाेरदार चर्चा सुरु आहे.
जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक आणि ग्लोबल टिचर पुरस्कार विजेते शिक्षक रणजितसिंह डिसले यांनी २०१६ मध्ये बालभारतीकडे पाठ्यपुस्तकात क्यूआर कोडचा समावेश करण्याची मागणी केली होती. बालभारतीने डिसले गुरूजींच्या या सूचनेचे स्वागत करून २०१६ पासून छापण्यात आलेल्या बालभारतीच्या सर्व पुस्तकात धड्याखाली क्यूआर कोडचा समावेश करण्यात आला. क्यूआर कोडमुळे प्रत्येक धड्यासाठी डिजिटल कंटेंट बनवून ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहचत होते. राज्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या या उपक्रमाचे इतरही राज्यांनी देखील अनुकरण केले, पण यंदा बालभारतीच्या पुस्तकात क्यूआर काेड छापण्यात आलेले नसल्याचे समाेर आले आहे.
-क्यूआर काेड असे तंत्र वापरणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य
ज्या तंत्रामुळे मुलांचे शिक्षण अधिक आकर्षणाचा विषय ठरला आहे. तेच तंत्रज्ञान का काढून टाकले आहे, क्यूआर कोडपेक्षा अधिक चांगले पर्याय बालभारतीकडे आहेत का? असा सवाल डिसले गुरूजींनी केला आहे. वर्ष २०१६ पासून बालभारतीच्या पुस्तकांत क्यूआर कोडचा वापर करण्यास सुरुवात झाली. असे तंत्र वापरणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य होते. कोरोनाच्या काळात शाळा बंद असतानाही क्यूआर कोड पुस्तकामुळे लाखो विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे सुलभ झाले हाेते.