
Raigad News: निर्यात माल अडकू नये म्हणून JNPA ची विशेष टीम; बंदरातील स्थितीत सुधारणा, कंटेनरची संख्या 5000 वरून 3200
मध्यपूर्वेतील परिस्थितीमुळे जहाजांच्या वेळापत्रकात बदल झाल्याने निर्यात मालाच्या वाहतुकीवर परिणाम झाला होता. या पार्श्वभूमीवर व्यापारातील अडचणी दूर करण्यासाठी जेएनपीए प्रशासनाने विविध विभागांच्या अधिकाऱ्यांचा समावेश असलेले विशेष समन्वय पथक स्थापन केले आहे. या पथकात परकीय व्यापार महासंचालनालय, सीमाशुल्क विभाग तसेच जेएनपीएचे वरिष्ठ अधिकारी सहभागी आहेत. व्यापाऱ्यांशी आणि निर्यातदारांशी सातत्याने संवाद साधण्यासाठी जेएनपीएचे मुख्य महाव्यवस्थापक (वाहतूक) गिरीश थोमस यांची प्रमुख संपर्क अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. (फोटो सौजन्य – AI Created)
रीफर ट्रान्सपोर्टर्स असोसिएशनसोबत झालेल्या सविस्तर चर्चेनंतर रेफर तसेच इतर कंटेनर वाहतुकीसाठी पुरेसे ट्रेलर्स उपलब्ध राहतील याची खात्री जेएनपीएतर्फे करण्यात आली आहे. त्यामुळे बंदरातून कंटेनर बाहेर पडण्याची प्रक्रिया कोणत्याही अडथळ्याविना सुरू आहे. विशेषतः केळी, द्राक्षे यांसारख्या लवकर नाश पावणाऱ्या कृषी मालाच्या कंटेनरची वेळेत व सुरक्षित हाताळणी करण्यावर भर दिला जात आहे.
या समन्वित प्रयत्नांमुळे बंदरातील परिस्थितीत सातत्याने सुधारणा होत आहे. अडकलेल्या नाशवंत कंटेनरची संख्या सुमारे २,००० वरून जवळपास १,००० पर्यंत कमी झाली आहे.
बदलत्या परिस्थितीवर जेएनपीए बारकाईने लक्ष ठेवून आहे. आयातीर निर्यात क्षेत्राला पाठबळ देण्यासाठी शिपिंग मंत्रालय, सीमाशुल्क विभाग, टर्मिनल ऑपरेटर्स आणि व्यापारी संघटनांसोबत सातत्याने समन्वय साधला जात आहे. – गोविंद दयाल, अध्यक्ष, जेएनपीए