
Raigad News: किहीममध्ये संयुक्त कचरा व्यवस्थापन केंद्राचे उद्घाटन; स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाला मिळणार नवी दिशा
या केंद्राचे उद्घाटन पिनाकीन पटेल यांच्या हस्ते झाले. किहीम ग्रामपंचायतीचे सरपंच प्रसाद ऊर्फ पिंट्या गायकवाड यांनी या उपक्रमासाठी विशेष पुढाकार घेतला असून ग्रामपंचायत आणि याज फाऊंडेशन यांच्या समन्वयातून हा प्रकल्प प्रत्यक्षात साकार झाला आहे. याज फाऊंडेशनचे भटू सावंत यावेळी उपस्थित होते. या केंद्रामध्ये ओला आणि सुका कचरा स्वतंत्रपणे संकलित करून त्यावर वैज्ञानिक पद्धतीने प्रक्रिया केली जाणार आहे. त्यामुळे कचऱ्याचे ढीग, दुर्गंधी, मोकळ्या जागेत कचरा टाकण्याच्या घटना आणि त्यातून निर्माण होणारे प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे.
प्लास्टिकसह पुनर्वापरयोग्य वस्तूंचे योग्य व्यवस्थापन होऊन संसाधनांचा पुनर्वापर वाढण्यास हातभार लागणार आहे. या लोकार्पण सोहळ्यास ग्रामपंचायत पदाधिकारी, याज फाऊंडेशनचे प्रतिनिधी, ग्रामस्थ तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. किहीम ग्रामपंचायत आणि याज फाऊंडेशन यांच्या या संयुक्त उपक्रमाचे ग्रामस्थांनी स्वागत करत, गावाला अधिक स्वच्छ, पर्यावरणपूरक बनविण्याच्या दिशेने हा प्रकल्प मैलाचा दगड ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली.
सामाजिक स्तरावर हा उपक्रम स्वच्छतेबाबत जनजागृती निर्माण करणारा ठरणार आहे. कचऱ्याचे जागेवरच वर्गीकरण, स्वच्छ परिसराची जबाबदारी आणि पर्यावरणपूरक जीवनशैली याबाबत ग्रामस्थांचा सहभाग वाढविण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. कचरा व्यवस्थापन ही केवळ ग्रामपंचायतीची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी असल्याचे मान्यवरांनी अधोरेखित केले.
भविष्यात किहीममधील हा प्रकल्प आदर्श मानून परिसरातील इतर ग्रामपंचायतीमध्येही अशा प्रकारचे संयुक्त कचरा व्यवस्थापन केंद्र उभारण्याचा मानस व्यक्त करण्यात आला. ग्रामीण भागात स्वच्छता, पर्यावरण संरक्षण आणि शाश्वत विकास यांचा समतोल साधणारा हा उपक्रम ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
‘काय बंधू…’ या हाकेची मन कायम वाट पाहत राहील; राजेंद्र पवार यांची भावनिक पोस्ट
पर्यावरणाच्या दृष्टीनेही हा प्रकल्प महत्वपूर्ण मानला जात आहे. कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावल्यामुळे माती, पाणी आणि हवेचे प्रदूषण कमी होण्यास मदत होईल. याशिवाय अनियंत्रित कचऱ्यामुळे भटक्या जनावरांना, पक्ष्यांना आणि सागरी पर्यावरणाला होणारा धोका कमी करण्यासाठीही हा उपक्रम उपयुक्त ठरणार आहे. पर्यटनस्थळ म्हणून ओळख असलेल्या किहीमच्या स्वच्छ प्रतिमेला या प्रकल्पामुळे अधिक बळ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.