Raigad News: खड्ड्यांतूनच गणेशभक्तांचा प्रवास? साईनगरच्या रस्त्यांची चाळण, प्रशासनाकडे तातडीच्या दुरुस्तीची मागणी
विशेष म्हणजे, माणगाव नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष तसेच विद्यमान नगरसेवक यांच्या घरासमोरदेखील मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे परिसरातील रस्त्यांची अवस्था किती गंभीर झाली आहे, याचा प्रत्यय येत आहे. या खड्ड्यांमधून वाहन चालविताना चालकांना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागत असून, दुचाकीस्वारांसाठी तर हा प्रवास अधिकच धोकादायक बनला आहे. साईनगर परिसरातील या रस्त्यांवरून दररोज अनेक विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच स्थानिक नागरिकांची ये-जा सुरू असते. खड्यांमुळे वाहनांचे नुकसान होण्याबरोबरच अपघाताची शक्यताही निर्माण झाली आहे. विशेषतः पावसामुळे खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने त्यांची खोली लक्षात येत नसल्यामुळे वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे.
गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवाच्या पाश्र्श्वभूमीवर हजारो नागरिकांची ये-जा होणार असताना नगरपंचायत प्रशासनाने या रस्त्यांकडे तातडीने लक्ष देऊन खड्डे बुजवावेत, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. केवळ तात्पुरती मलमपट्टी न करता रस्त्यांची आवश्यक त्या ठिकाणी कायमस्वरूपी दुरुस्ती करण्याची गरज व्यक्त होत आहे.
साईनगरमध्ये रस्त्यांची दुरवस्था नागरिकांच्या रोजच्या जीवनाशी संबंधित असतानाही प्रशासनाकडून उपाययोजना होत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. खड्डयांवर वेळीच उपाययोजना न केल्यास आगामी उत्सवांच्या काळात एखादी दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोणाची?, असा सवालही नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. आता तरी माणगाव नगरपंचायत प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधी या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेऊन गणेशोत्सवापूर्वी रस्त्यांची दुरुस्ती करणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
येत्या काही दिवसांत साईनगर मित्रमंडळाचा दहीकाला उत्सव तसेच माणगाव तालुक्यातील सर्वात मोठ्या सार्वजनिक गणेशोत्सवांपैकी एक असलेल्या ‘साईनगरचा राजा’ गणेशोत्सवाचे आयोजन होणार आहे. या उत्सवासाठी माणगाव तालुक्याच्या विविध भागांतून मोठ्या संख्येने गणेशभक्त साईनगर परिसरात दाखल होतात. मात्र, सध्याच्या रस्त्यांच्या अवस्थेमुळे बाहेरून येणाऱ्या गणेशभक्तांना याच खड्डेमय रस्त्यांवरून प्रवास करावा लागणार आहे. त्यामुळे उत्सवाच्या काळात वाहतूक वाढल्यास परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे.






