
‘माथेरानची सुपीक माती डोंगराखाली का सोडली?’ शाळकरी मुलाचा सवाल, ‘आपली लाल सुपीक माती वाचवणार कोण?’
माथेरानमधील मेहुल राकेश कोकळे या विद्यार्थ्याने व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या मनातील प्रश्न मांडला आहे. गेल्या तीन दिवसांपासून तो दररोज माथेरान गावातून चालत शार्लोट लेकपर्यंत जात असून, तलाव परिसरातील परिस्थिती पाहिल्यानंतर त्याने हा व्हिडिओ तयार केला. “माथेरानच्या जंगलातील सुपीक माती आपण डोंगराखाली का सोडली?” असा सवाल मेहुलने केला आहे. माथेरानची लाल आणि सुपीक माती पाण्यासोबत वाहून जाऊन डोंगराखाली जाण्यापेक्षा तिचा उपयोग स्थानिक पातळीवर करता येऊ शकतो, असे त्याचे म्हणणे आहे.
मेहुलने आपल्या व्हिडिओमध्ये सुपीक माती दुसऱ्या गावाला देण्याऐवजी ती वाचवावी, असे आवाहन केले आहे. या मातीतून माथेरानमधील रस्त्यांची कामे करता येतील, असा विचार त्याने मांडला. “ठेकेदार काकांनी पुन्हा एकदा विचार करावा आणि आपली माती वाचवावी. त्या मातीतून आपल्या गावातील रस्ते बनवूया,” असे आवाहन त्याने केले आहे. एका शाळकरी मुलाने पर्यावरण आणि स्थानिक संसाधनांबाबत उपस्थित केलेला हा प्रश्न नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे.
शार्लोट लेकच्या संवर्धनाचे काम केंद्र सरकारच्या अमृत-२ योजनेअंतर्गत सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. या कामाचा एक भाग म्हणून तलावातील गाळ काढण्याची प्रक्रिया करण्यात येत आहे. मात्र, तलावातून काढण्यात आलेल्या गाळ आणि मातीच्या वापराबाबत आता प्रश्न उपस्थित झाले आहेत. जानेवारी २०२६ मध्ये माथेरान नगरपरिषदेने तलावातून १ हजार ट्रक माती बाहेर काढल्याबद्दल ठेकेदाराला पेमेंट अदा केल्याचा दावा या प्रकरणात करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर तलावातील गाळ आणि मातीचा नेमका वापर काय झाला, ती कुठे नेण्यात आली आणि तिचे संवर्धन किंवा पुनर्वापर का करण्यात आला नाही, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
शार्लोट लेकमधील पाणी सोडून देण्याच्या निर्णयावरही शहरात विविध मतप्रवाह आहेत. गाळ आणि माती पाण्यासोबत वाहून जावी, यासाठी तलावातील पाणी सोडण्यात आले असल्याचा आरोपही केला जात आहे. या आरोपांबाबत संबंधित प्रशासन किंवा ठेकेदाराची अधिकृत भूमिका स्वतंत्रपणे स्पष्ट होणे आवश्यक आहे. दरम्यान, या सर्व वादाच्या केंद्रस्थानी आता मेहुलने उपस्थित केलेला पर्यावरणाशी संबंधित प्रश्न आला आहे.
माथेरानसारख्या पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील पर्यटनस्थळी स्थानिक माती, पाणी आणि नैसर्गिक संसाधनांचे जतन कसे करायचे, हा मूलभूत प्रश्न मेहुलच्या व्हिडिओमुळे पुन्हा समोर आला आहे. महापालिका, प्रशासन आणि संबंधित यंत्रणांनी तलावातील गाळ व मातीबाबत पारदर्शक माहिती द्यावी आणि उपलब्ध नैसर्गिक संसाधनांचा स्थानिक विकासासाठी योग्य वापर करता येईल का, याचा विचार करावा, अशी मागणी आता पुढे येत आहे. एका नववीतील विद्यार्थ्याने उपस्थित केलेला हा साधा प्रश्न माथेरानच्या पर्यावरण संवर्धनाबरोबरच शार्लोट लेकच्या कामकाजातील पारदर्शकतेबाबतही विचार करायला लावणारा ठरत आहे.