
Raigad News: ८ महिन्यांत निवृत्ती... तरीही अचानक बदली, श्रीवर्धनमध्ये नेमकं काय घडलं? ग्रामस्थांचा प्रशासनाला इशारा
महार तलावाच्या सुशोभीकरणासाठी मंजूर झालेल्या सुमारे १ कोटी रुपयांच्या निधीतून पूर्ण झालेले काम अपूर्ण असून, त्यात भ्रष्टाचार झाल्याचा संशय व्यक्त करत ग्रामस्थांनी चौकशीची मागणी लावून धरली होती. अशातच अपूर्ण कामाची चौकशी न करता पुन्हा नव्याने निधी मंजूर करण्याचा प्रस्ताव काही महिन्यांपूर्वी ग्रामसभेत आणला गेला. त्याला ग्रामस्थांनी जोरदार विरोध दर्शवला होता. हा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी प्रशासक नागे यांच्यावर मोठा राजकीय व वरिष्ठ पातळीवरून दबाव आणला जात असल्याचे सांगितले जाते.
प्रलंबित विकासकामांना बसण्याची भीती त्यानंतर नागे यांच्याकडून बदलीचा अर्ज लिहून घेत ‘वयाची ५३ वर्षे पूर्ण झाल्याने स्वेच्छा बदली’ या कारणाखाली तातडीने बदलीचे आदेश काढण्यात आले. सेवानिवृत्ती तोंडावर असताना अशी घाईघाईने केलेली बदली संशय अधिक बळवणारी ठरली आहे. गेल्या दोन वर्षांत ३ ते ४ ग्रामपंचायतींचा अतिरिक्त कारभार सांभाळताना नागे यांनी पाणीपुरवठा व स्थानिक समस्या थेट मैदानात उतरून सोडवल्या होत्या. त्यामुळे या बदलीचा फटका गावातील प्रलंबित विकासकामांना बसण्याची भीती व्यक्त होत आहे.
“ज्या तत्परतेने लोकभिमुख प्रशासकाची तडकाफडकी बदली केली, त्याच तत्परतेने महार तलाव सुशोभीकरणातील भ्रष्टाचाराची सखोल चौकशी का केली जात नाही?, असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. तलावाच्या कामातील कथित अनियमिततेची चौकशी पूर्ण होत नाही, तोपर्यंत नव्याने मंजूर झालेला निधी वापरू देणार नाही आणि कोणतेही काम सुरू होऊ देणार नाही, असा इशारा दिला आहे.
मागील निधीच्या कामाची चौकशी झालेखेरीज कोणतेही कागदपत्र देण्यात येऊ नये, असा ग्रामसभेचा ठराव पारीत झाल्याने नागे यांनी कागदपत्र न पुरविलेनेच कोणाचा तरी इगो दुखविला गेल्यानेच बदली झाली आहे.- चंद्रकांत धनावडे, ग्रामस्थ, बोलींपंचतन
विस्ताराधिकारी नागे यांच्या बदली हि त्यांच्या विनंती अर्जानुसार केली आहे आणि जिल्हा परिषद मुख्याधिका-यांना तसे अधिकार आहेत. – विशाल तनपुरे, उप कार्यकारी अधिकारी