अंधेरी पोटनिवडणुकीत भाजप विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यात रणसंग्राम सुरु असताना मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याना पात्र लिहलंय. या पत्रात त्यांनी अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीतून आपला उमेदवार मागे घ्यावा, भाजपनं निवडणूक लढवू नये, असं आवाहन देवेंद्र फडणवीस यांना केलं आहे.
आमदार रमेश लटके यांच्या दुर्दैवी निधनानंतर अंधेरी (पूर्व) विधानसभा पोट-निवडणुकीबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नम्र आवाहन आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची धोरणात्मक भूमिका असं म्हणत राज ठाकरेंनी ट्वीट केलं आहे. “एक विशेष विनंती करण्यासाठी हे पत्र आपणांस लिहितो आहे. आमदार कै. रमेश लटके यांच्या दुर्दैवी निधनानंतर अंधेरी (पूर्व) या विधानसभेच्या जागेसाठी पोट निवडणूक जाहीर झाली आहे. तिथे त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे.
दिवंगत रमेश एक चांगले कार्यकर्ते होते. अगदी शाखा प्रमुखापासून त्यांची वाटचाल सुरू झाली. त्यांच्या राजकीय प्रवासाचा मी एक साक्षीदार आहे. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नीनं आमदार होण्यानं कै. रमेश यांच्या आत्म्यास खरोखर शांती मिळेल. त्यामुळे माझी विनंती आहे की, भारतीय जनता पक्षानं ती निवडणूक लढवू नये आणि त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके आमदार होतील हे पहावं.”, असं भावनिक आवाहन राज ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना पत्रातून केलं आहे.
“मी आमच्या पक्षातर्फे अशा परिस्थितीत जेव्हा दिवंगत आमदाराच्या घरच्या व्यक्ती निवडणूक लढवतात. तेव्हा शक्यतो निवडणूक न लढवण्याचं धोरण स्वीकारतो. तसं करण्यानं आपण त्या दिवंगत लोकप्रतिनिधीला श्रध्दांजलीच अर्पण करतो, अशी माझी भावना आहे. आपणही तसं करावं असं मला माझं मन सांगतं. असं करणं हे आपल्या महाराष्ट्राच्या महान संस्कृतीशी सुसंगतही आहे. मला आशा आहे आपण माझ्या विनंतीचा स्विकार कराल.”, असं म्हणत राज ठाकरेंनी फडणवीसांना विनंती केली आहे. तसेच, देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्राच्या शेवटी राज ठाकरेंनी आपला मित्र असा उल्लेख केला आहे.