"खचलो नाही, पुन्हा लढणार आणि जिंकणार"; पराभव झाल्यानंतर काय म्हणाले प्रशांत यादव
चिपळूण/ प्रतिनिधी: विधानसभा निवडणूकात राज्यात महायुतीच्या उमेदवारांनी बहुमतांनी विजय मिळवला आहे. चिपळूणमध्ये महायुतीचे उमेदवार शेखर निकम यांचा 96555 मतांनी विजयी झाला. दरम्यान चिपळूणमध्ये शेखर निकम आणि प्रशांत यादव यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळाली होती. मात्र या निवडणूकीत प्रशांत यादव यांना निसटता पराभव पत्करावा लागला. याच पार्श्वभूमीवर यादव यांनी चिपळूणमधील जनतेशी संवाद साधला आहे. महाविकास आघाडीचे प्रशांत यादव यांनी विधानसभा निवडणूकीत झालेल्या पराभवावर त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
चिपळूणकरांशी संवाद साधताना शरद पवार गटाचे प्रशांत यादव म्हणाले की, हरलो म्हणून काय झाले,खचलेलो नाही, तुम्हीही खचू नका. 90 हजार लोकांच्या हृदयात मला स्थान मिळाले,हीच तुमची आणि माझी कमाई आहे,….माझ्यासाठी ज्या-ज्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली. संघर्ष केला त्यांना एकालाही वाऱ्यावर सोडणार नाही. वाटेल ते करीन पण तुम्हाला अंतर देणार नाही, विचारांची लढाई जबरदस्त आशा ताकदीने आपण लढलेली आहे. त्यामुळे पराभवाची चिंता न करता मी मैदानात उतरलोय. तुम्हीही कामाला लागा, पुन्हा लढणार आणि जिंकणार आशा शब्दात पराभूत उमेदवार प्रशांत यादव यांनी गुरुवारी थेट एल्गार पुकारला.
विधानसभा निवडणुकीत चिपळूण संगमेश्वर मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत यादव यांचा अवघ्या 6 हजार867 मतांच्या फरकाने पराभव झाला.त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवसापासून यादव यांनी कामाला सुरुवात केली आहे. देवरुख येथे मतदार आभार मेळावा घेतल्यानंतर गुरुवारी त्यांनी चिपळूण शहरातील अतिथी सभागृहात आभार मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला होता. प्रचंड मोठ्या संख्येने महाविकास आघाडीचे पदाधिकारी,कार्यकर्ते,महिला पदाधिकारी उपस्थित होते.
प्रशांत यादव यांनी अत्यंत तडाखेबंद भाषण केले.ते म्हणाले की, अवघ्या काही दिवसात या मतदारसंघात आपण जो झंझावात निर्माण केलात त्याला तोड नाही.लढाई मोठी होती,अनेक अडचणी होत्या.त्यात मी नवखा होतो.समोर सत्ता,संपत्ती आणि हजारो कोटींची कामांचा दावा,त्यामुळे सत्ता संपत्ती विरोधात सामान्य जनता अशी ही लढाई होती.मात्र तुम्ही अशी काही झुंज दिलीत की समोरच्याला घाम फुटला,महाराष्ट्रात सर्वत्र निकालांची चर्चा होत आहे.परंतु चिपळूण संगमेश्वर मतदारसंघातील लढाईची चर्चा देखील महाराष्ट्रात होत आहे.हेच तुमच्या कामाची पोच पावती आहे.असेही प्रशांत यादव म्हणाले.
कुठे काय चुकले,कुठे कमी पडलो याचे आत्मचिंतन आपण करू,पण ज्याप्रमाणे तुम्ही जीवाचे रान केलेत आणि अभूतपूर्व असा लढा दिलात त्याबद्दल मी आणि माझे कुटुंब तुमचे आयुष्यभर ऋणी राहू,तुम्ही जे प्रेम आणि जिवाभावाचे नाते निर्माण केलंत त्यातून आम्हाला उत्तराई होता येणार नाही.मी कोणालाही अंतर देणार नाही.महाविकास आघाडीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्णय मी घेतला आहे.तुमच्यासाठी वाट्टेल ते करीन पण तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही.आशा शब्दात त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना जबरदस्त असा धीर दिला.
पुढे यादव असंही म्हणाले की, मी शांत संयमी जरूर आहे.मात्र एकदा का कोणीमाझ्या वाकड्यात आलं की करेक्ट कार्यक्रम केल्याशिवाय स्वस्थ ही बसत नाही.तुमची इतकी मोठी ताकद माझ्या पाठीशी असताना मी कोणाच्या बापालाही घाबरत नाही.मी मैदानात उतलोय,आता पुढची लढाई सुरू झाली आहे.पुढे जिल्हापरिषद,पंचायत समिती आणि नगरपालिकेच्या निवडणुका आहेत.त्यासाठी आज पासूनच कामाला लागा.वरिष्ठ पातळीवर जो निर्णय होईल तो होईल,पण येथे आपण एकत्र येऊन लढायचे आहे. मी तुमच्या पाठी ठाम उभा आहे.अजिबात काळजी करू नका.आता आलेले अपयश हे पुढील विजयाचे संकेत आहेत. नियतीने कदाचित मोठा विजय आपल्यासाठी ठेवला आहे. त्यासाठी आपल्याला लढायचे आहे.असेही ते म्हणाले.
आगामी काळात काहीजण सत्तेच्या दिशेने जाण्याची श्यक्यता आहे.याची कल्पना मला पूर्वीच आली होती.पण तुमच्या सारखे कडवट कार्यकर्ते माझ्या बरोबर होते.आणि जो पर्यंत तळागाळातील कार्यकर्ता माझ्या बरोबर आहे.तो पर्यंत मी अजिबात कोणाची चिंता करत नाही. त्यामुळे जे जाणार असतील त्यांना जाऊद्या,आपल्यातले जे सूर्याजी पिसाळ असतील त्यांना बाजूला करून आपण भक्कमपणे एकत्र राहूया,आणि या मतदारसंघात इतिहास घडवूया अशा शब्दात प्रशांत यादव यांनी कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देत नव्याने सुरुवात करण्यास सांगितले आहे.