चिपळूण :- तालुक्यातील कात्रोळी येथील विठ्ठल रखुमाई मंदिरात ‘आपला कृषिसखा परिवार’ यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कृषी कार्यशाळेला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शेती आणि शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी एक मैलाचा दगड ठरलेल्या या कार्यशाळेत भात पिकावरील कीड नियंत्रण, आधुनिक शेती तंत्रज्ञान, नवीन पिकांची माहिती, मृदा परीक्षण, सिंचन व्यवस्थापन आणि विविध सरकारी योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली. परिसरातील शेकडो शेतकऱ्यांनी या मार्गदर्शन सत्राचा लाभ घेतला.
कार्यशाळेचे मुख्य आकर्षण होते सुप्रसिद्ध कृषी तज्ज्ञ डॉ. पांडुरंग मोहिते यांचे प्रभावी मार्गदर्शन ठरले. यावेळी डॉ. मोहिते यांनी त्यांच्या अफाट अनुभवाने आणि सखोल ज्ञानाने शेतकऱ्यांच्या अनेक शंकांचे निरसन केले. त्यांनी केवळ पुस्तकी ज्ञान न देता, प्रत्यक्ष शेतात उपयोगी ठरणारी व्यावहारिक माहिती दिली. शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले समाधानाचे हास्य हेच या कार्यशाळेच्या यशाची पावती होती.
कार्यशाळेतील प्रमुख विषय भात पिकावरील कीड नियंत्रण हा होता. रत्नागिरी जिल्ह्यासह महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात भात पिक घेतले जाते. मात्र, सतत बदलणाऱ्या हवामानामुळे आणि नवीन कीटकांच्या प्रादुर्भावामुळे भात उत्पादकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. डॉ. मोहिते यांनी भात पिकाला साधारणतः कोणत्या किडींचा धोका असतो, त्या किडींची ओळख कशी करावी, आणि त्यांच्या नियंत्रणासाठी कोणत्या जैविक व रासायनिक पद्धतींचा अवलंब करावा यावर सविस्तर विवेचन केले. त्यांनी एकात्मिक कीड व्यवस्थापनाचे (IPM) महत्त्व पटवून दिले, ज्यामुळे रासायनिक कीटकनाशकांचा वापर कमी होऊन पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होईल.
याव्यतिरिक्त, मृदा परीक्षण (Soil Testing) का महत्वाचे आहे, मृदा परीक्षणाचे फायदे काय आहेत आणि त्यासाठी सरकारने कोणत्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत, यावरही मार्गदर्शन झाले. सिंचन व्यवस्थापनातील (Irrigation Management) आधुनिक तंत्रज्ञान, जसे की ठिबक सिंचन आणि तुषार सिंचनाचा वापर करून पाण्याची बचत कशी करावी आणि पिकाचे उत्पादन कसे वाढवावे, याबाबतही माहिती देण्यात आली. शेतकऱ्यांसाठी असलेल्या विविध सरकारी योजनांची माहिती, जसे की कृषी कर्ज, पीक विमा योजना, शेततळे योजना आणि अनुदानावर मिळणारे कृषी साहित्य याबद्दल सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले, जेणेकरून शेतकऱ्यांना या योजनांचा जास्तीत जास्त लाभ घेता येईल.
‘आपला कृषिसखा परिवार’ने शेतकऱ्यांसाठी उचललेले हे पाऊल निश्चितच कौतुकास्पद आहे. या कार्यशाळेमुळे शेतकऱ्यांमध्ये नवीन ऊर्जा आणि आत्मविश्वास निर्माण झाला असून, त्यांना आधुनिक शेतीत तंत्रज्ञान आत्मसात करून आपली शेती अधिक किफायतशीर आणि समृद्ध करण्यास निश्चितच मदत झाली आहे.
या कार्यशाळेसाठी चे मार्गदर्शन हे कृषिभूषण डॉक्टर तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. निखिल चोरगे , गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संकेत कदम , जिजामाता महिला कृषी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. शमिका चोरगे , ग्रामीण कृषी कार्यानुभव समन्वयक प्राध्यापक प्रशांत इंगवलेयांचे मार्गदर्शन लाभले. या कार्यशाळेसाठी डॉ.पांडुरंग मोहिते ,प्राध्यापक अनिल कांबळे, प्राध्यापक समेद वडगावे गावचे सरपंच श्रीकांत निवळकर आणि गावातले प्रगतशील शेतकरी उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी पाडण्यासाठी कृषिसखा ग्रुपचे सर्व कृषिदूत आनंद नलावडे,स्वयं बारी,अनिरुद्ध घंटे,सत्यजित आसने,घनश्याम राऊत,ईशान डुंबरे,साहिल रसाळ,प्रतिक नाईक, श्रेयस सावंत,अंकुश पवार,श्रीगोपाल नायर आणि
रुदुल आखाडे हे सर्वजण उपस्थित होते.