
उष्माघात प्रतिबंधासाठी रत्नागिरी आरोग्य विभाग सतर्क
रत्नागिरी जिल्ह्यात उन्हाचा कडाका
नागरिकांना सतर्कतेचा इशारा
गुहागर: रत्नागिरी जिल्ह्यात उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. वाढत्या तापमानामुळे उष्माघाताचा धोका निर्माण झाला आहे, हे लक्षात घेऊन रत्नागिरी जिल्हा परिषद आरोग्य विभाग सतर्क झाला असून, जिल्ह्यातील सर्व आरोग्य यंत्रणांना विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. त्यासाठी जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्यकेंद्रे, उपकेंद्रे, ग्रामीण रुग्णालये आणि उपजिल्हा रुग्णालयांना उष्माघात प्रतिबंध व उपचारासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने राबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
शासकीय रुग्णालयांमध्ये पुरेशी औषधे, ओआरएस पाकिटे आणि आपत्कालीन परिस्थितीसाठी खाटांची व्यवस्था ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मार्च महिन्यात उन्हाचा कडाका वाढतो. त्यामुळे वातावरणातही बदल होतो. गेल्या काही दिवसांत जिल्ह्यात काही ठिकाणी पारा ३४ ते ३८ अंश सेल्सिअस दरम्यान राहिलेला आहे.
मानवी आरोग्यावर अधिक परिणाम
परिणामी, दुपारच्या सुमारास उन्हाची तीव्रता अधिक जाणवते. सूर्याच्या प्रखर उष्णतेचा मानवी आरोग्यावर अधिक परिणाम होतो. त्यातून अनेकवेळा या कालावधीत दुपारच्या सुमारास उष्माघाताचा त्रास जाणवण्याची शक्यता असते. कामासाठी बाहेर पडणाऱ्या व्यक्तीला उन्हाचा त्रास होतो. यंदा उन्हाची तीव्रता वाढण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाकडून जाहीर करण्यात आले आहे. या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी आरोग्य विभागाकडून तयारी सुरू झाली आहे.
काय करावे भरपूर पाणी प्या. आहारात ताक, उसाचा रस, फळांचा रस आणि सॅलडचा समावेश करा. बाहेर जाताना छत्री, टोपी, गॉगल आणि पाण्याची बाटली सोबत ठेवा, सैल व सुती कपडे वापरा. काय टाळावे : दुपारी १२ ते ४ या वेळेत कडक उन्हात बाहेर जाणे टाळा. उपाशीपोटी बाहेर पडू नका.
Pune Heat Wave: हुश्श! किती तो उन्हाळा; पुणेकर उकाड्याने वैतागले; पारा थेट…
पुणेकर उकाड्याने वैतागले
पुणे शहर आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ होत असून उष्णतेचा कडाका वाढल्याचे चित्र आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच तापमानाने झेप घेतल्याने पुणेकर उकाड्याने हैराण झाले आहेत. बुधवारी (ता. ११) शहरात किमान १७.५ अंश सेल्सिअस, तर कमाल ३६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.