
उरुल धरणातील पाणी सोडा; पाणीटंचाईसाठी उरुल, बोडकेवाडी ग्रामस्थ आक्रमक
मल्हारपेठ : सध्या उरूल धरणात उपलब्ध असणाऱ्या पाणी साठ्यापैकी काही प्रमाणात बोडकेवाडी, उरल परिसरात पाणी स्रोत आटल्याने हंबवळी या बाजूने पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थ शेतकरी वर्गाने केली आहे.
सध्या यावर्षीचा प्रचंड कडकडीत उन्हाळा आहे, उरुल बोडकेवाडी परिसरातील शिवारात पाण्याचा स्त्रोत बंद झाल्याने विहिरी आटल्या आहेत. उरुल धरणाच्या दुसऱ्या टोकाच्या बाजूने, हंबवळी या ठिकाणाहून उरुल धरणातील उपलब्ध साठ्यापैकी पाणी सोडल्यास उरुल, बोडकेवाडी व इतर वाड्या परिसरातील ओढा, विहीर, शेती शिवारासह पिण्याच्या पाण्याची सोय होईल या विचाराने सर्व ग्रामस्थांनी धरण बांधकाम ठेकेदार यांना भेटून माहिती दिली आहे. याचबरोबर लवकरात लवकर पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे मागणी केली जाणार आहे.
उरूल धरण परिसरातील गावाला शेती शिवारासह पिण्याची पाण्याची सोय कायमस्वरूपी व्हावी यासाठी उरूलच्या धरणाची निर्मिती करण्याची सुपीक आयडिया डोक्यात घेऊन तत्कालीन प्रशासनाने सुरुवात केली. मात्र, अनेक अडथळ्यानंतर आजही उरूलचे मातीचे धरण अपूर्ण अवस्थेत आहे, ती तातडीने पूर्ण करण्यासाठी परिसरातील स्थानिकांकडून मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे. पाटण तालुक्यातील उरुल-ठोमसे येथे गेल्या १५ वर्षांपासून सुरू असलेल्या उरूल लघु पाटबंधारे अंतर्गत येणाऱ्या धरणाचे काम अद्यापही अपूर्ण अवस्थेतच आहे. अजूनही काम अपूर्णच असून, सध्या धरणात ३० टक्के पाणीसाठा केल्याने उर्वरित भिंत, भराव, सांडवा ठोंमसेला जाणारा रस्ता गाव विहीर ही कामे अपूर्ण अवस्थेत आहेत.
उरुल धरणातील सध्या उपलब्ध असणाऱ्या पाणी साठ्यापैकी काही प्रमाणात उन्हाळ्यातील तातडीची गरज म्हणून या उन्हाळ्यात पाणी सोडण्यात यावे. त्यामुळे गुराढोरांना शेती पिकांना व पिण्याचे पाणी पुरवणाऱ्या योजनांना पाणीसाठा उपलब्ध होईल या भावनेने सर्व शेतकऱ्यांनी धरणातील पाणी सोडण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
कर्जत तालुक्यातही भीषण पाणी टंचाई
कर्जत तालुक्यातील ग्रामीण आणि आदिवासी भागातील पाण्याचे दुर्भिक्ष्य वाढले आहे. जलजीवन योजनेचे माध्यमातून राबविल्या जाणाऱ्या नळपाणी योजना यांची कामे रखडली आहेत. त्यामुळे तालुक्यातील पाण्याची टंचाई वाढली आहे. दरम्यान, कर्जत तालुक्यात आता चार गावे आणि सात आदिवासी वाड्या यांना टँकरने पाणी पुरवठा सुरू असून पाच टँकर यांच्या माध्यमातून पाणी पुरवठा सुरू असल्याची माहिती कर्जत पंचायत समिती समितीने दिली आहे.