
राज्याच्या प्रशासकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत एका अधिकाऱ्यांन तब्बल 34 वर्षांचा यशस्वी सेवाप्रवास पूर्ण केला आहे. ग्रामीण भागातून शिक्षण घेत त्यांनी कृषी शाखेत B.Sc. व M.Sc. पदवी संपादन केली आणि 1992 साली MPSC द्वारे उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून शासकीय सेवेत प्रवेश केला. रविंद्र शिंदे यांनी पालघरच्या जिल्हा परिषदेची अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून सध्या यशस्वी धुरा सांभाळली. या संपूर्ण त्यांच्या कारकीर्दीत त्यांनी गटविकास अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अशा विविध पदांवर कार्य करत अनेक विकासकामे यशस्वीपणे राबवली. जालना येथे 200 कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना अनुकंपा तत्त्वावर नोकऱ्या देणे, सोलापूरमध्ये कुपोषण मोठ्या प्रमाणात कमी करणे, तसेच सांगली जिल्हा परिषदेला ISO मानांकन मिळवून देणे ही त्यांची ठळक कामगिरी ठरली.
ठाणे जिल्हा परिषदेला यशवंत पंचायत राज अभियानात सलग दोन वर्षे प्रथम क्रमांक मिळवून देण्यात त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले. “उमेद” अभियानांतर्गत अडीच लाख बचत गटांची स्थापना करून सुमारे 25 लाख महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यात त्यांनी मोठी भूमिका बजावली. कोविड काळात प्रभावी नियोजन करत नियंत्रण ठेवणे, जल जीवन मिशनमध्ये राज्यस्तरीय काम करणे तसेच पालघर जिल्ह्यात आदिवासींसाठी विहिरी, रस्ते व घरकुल योजना राबवणे यामध्येही त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली.त्यांच्या पारदर्शक व जनहिताच्या कामकाजामुळे ग्रामीण विकास, महिला सक्षमीकरण आणि आदिवासी उन्नतीसाठी त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. म्हणूनच आज सेवा निवृत्त होताना त्यांना अनेक स्तरातून शुभेच्छा देण्यात येत आहेत.