
फोटो सौजन्य - Social Media
मताधिक्याएवढ्या वृक्षलागवडीचा संकल्प
दिवंगत आमदार अनिलभाऊ बाबर यांचा वारसा जपणारे आमदार सुहास बाबर यांनी नवा उपक्रम हाती घेतला आहे. 2024 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत सुहास बाबर यांना एकूण ७८,१७८ मते मिळाली होती. या मताधिक्यांची परतफेड म्हणून आणि निसर्गाला भेट म्हणून त्यांनी मिळालेल्या मताधिक्याएवढ्या वृक्षलागवडीचा संकल्प हाती घेतला आहे. आपल्या कार्यकाळात मतदारसंघातील पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मताधिक्याएवढी झाडे लावण्याचे आमदार सुहास बाबर यांचे ध्येय आहे. एकंदरीत, एकूण ७८,००० हून अधिक झाडे या उपक्रमात लावण्यात येणार आहेत.
ट्री आर्मी : पर्यावरणासाठी उभी राहिलेली लोकचळवळ
MLA Suhas Babar यांनी सोशल मीडियावर ‘पिंपळाची गोष्ट’ हा उपक्रम सुरू केल्यानंतर या हरित मोहिमेला नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळू लागला. लोक स्वतःहून जागा उपलब्ध करून देत असून, पाणी आणि श्रमदानासाठीही पुढाकार घेत आहेत. त्यामुळे ‘ट्री आर्मी’ आता एक शिस्तबद्ध आणि लोकसहभागातून उभी राहिलेली चळवळ बनली आहे.
या मोहिमेत आमदार बाबर यांनी वैयक्तिक योगदान देत मातोश्रींच्या श्राद्धदिनी तब्बल ५,३०० आंब्याची कलमे लावली. तसेच विटा नगरपालिकेतील एका नगरसेवकाने चार वर्षे वयाची ५२ झाडे भेट दिली, तर आळसंद ग्रामपंचायतीने ५०० झाडांचे रोपण केले आहे. पर्यावरण संवर्धनाला अधिक चालना देण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि वन विभागाच्या सहकार्याने एक एकर जागेत जपानी पद्धतीचे ‘मियावकी जंगल’ विकसित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. याशिवाय रस्ता रुंदीकरणामुळे नष्ट झालेल्या ‘ग्रीन टनेल’चे पुनरुज्जीवन करून रस्त्यांवरील हिरवाई पुन्हा निर्माण करण्याचे ध्येयही या मोहिमेत ठेवण्यात आले आहे.
५ जूनला ‘वसुंधरा दिना’निमित्त विशेष वृक्षलागवड मोहीम
जागतिक वसुंधरा दिनाचे औचित्य साधत येत्या ५ जून रोजी वड, पिंपळ, बहावा, करंज आणि चिंच यांसारख्या स्थानिक व सावलीदार वृक्षांची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात येणार आहे. ‘ट्री आर्मी’च्या माध्यमातून केवळ वृक्षलागवडच नव्हे, तर झाडांचे संगोपन, संवर्धन आणि दीर्घकालीन जतन यावरही विशेष भर दिला जात आहे. खानापूर-आटपाडी मतदारसंघातील नोकरी किंवा व्यवसायानिमित्त बाहेरगावी स्थायिक झालेल्या नागरिकांनीही आपल्या मातीतल्या या हरित उपक्रमात सहभागी होऊन गावाशी असलेली नाळ अधिक घट्ट करावी, असे आवाहन Suhas Babar यांनी केले आहे.