
मोठी बातमी! शेतकरी कर्जमाफीची 30 जूनची डेडलाईन हुकणार; 5 जुलैनंतर खात्यात जमा होणार रक्कम
राज्यातील शेतकरी कर्जमाफीबाबत मोठी माहिती समोर आली आहे. विधानसभेत बोलताना कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सरकारने दिलेली 30 जूनची मुदत पाळता येणार नसल्याचे स्पष्ट केले. कर्जमाफी योजनेला आवश्यक मंजुरी आणि राज्यपालांची स्वाक्षरी झाल्यानंतर 5 जुलैनंतर शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा होण्यास सुरुवात होईल, असे त्यांनी सांगितले.
दत्तात्रय भरणे म्हणाले की, कर्जमाफीसाठी ठरवण्यात आलेल्या अटी आणि निकषांवर सरकारमध्ये तसेच विरोधी पक्षांसोबत सविस्तर चर्चा झाली आहे. विरोधी पक्षांनी सुचवलेल्या काही सकारात्मक मुद्द्यांचाही विचार करण्यात आला असून त्यानुसार निकषांमध्ये बदल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
त्यांच्या माहितीनुसार, प्राथमिक अंदाजानुसार राज्यातील 56 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळण्याची शक्यता आहे.
भरणे यांनी सांगितले की, सध्या पुरवणी मागण्यांवर चर्चा सुरू असून त्यामध्ये कर्जमाफीसाठी आवश्यक निधीचा समावेश आहे. मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्यानंतर प्रस्ताव राज्यपालांकडे पाठवला जाईल. राज्यपालांची मंजुरी मिळाल्यानंतर 5 जुलैनंतर शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ दिला जाईल.
कृषीमंत्री म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना शेतकऱ्यांची चिंता आहे. “आम्हीही शेतकऱ्यांची लेकरं आहोत. अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना मदत करणे हे सरकारचे कर्तव्य आहे आणि त्यासाठी सरकार सकारात्मक निर्णय घेत आहे,” असे त्यांनी सांगितले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी सरकारवर टीका करत कर्जमाफीच्या घोषणांमध्ये केवळ वेळकाढूपणा सुरू असल्याचा आरोप केला.
राजू शेट्टी म्हणाले, “सरकार सतत नवीन तारीख जाहीर करत आहे. अर्थसंकल्पात कर्जमाफीसाठी निधीची तरतूद असल्याचे सांगण्यात आले होते. मग आता राज्यपालांकडे प्रस्ताव पाठवण्याचे कारण काय?” ते पुढे म्हणाले की, 30 जूननंतर अनेक शेतकरी थकबाकीदार ठरणार असून त्यांना मिळणारे 50 हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदानही धोक्यात येऊ शकते. सरकारने कोणतेही निकष न लावता सरसकट कर्जमाफी जाहीर करावी, अशी मागणीही त्यांनी केली.