मुंबई : लोकसभा निवडणूकीपूर्वी राज्यामध्ये नवीन राजकीय समीकरण पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर अनेक राजकारणी पक्षाची साथ सोडत आहेत. उद्धव ठाकरे यांच्या गटाला अनेक नेत्यांनी रामराम ठोकला आहे. आता पूर्व विदर्भ महिला आघाडी संपर्क प्रमुख आणि पक्षाच्या प्रवक्त्या शिल्पा बोडखे यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा उद्धव ठाकरेंना पाठवला आहे. मुंबई कार्यालयात बसून विशाखा राऊत आणि रंजना नेवाळकर मनमानी करत आहेत. असा आरोप करणारे खळबळजनक पत्र शिल्पा बोडखे यांनी उद्धव ठाकरेंना लिहिले आहे.
शिल्पा बोडखे यांनी उद्धव ठाकरे गटावर जहरी टीका केली आहे. बोडखे म्हणाल्या, माझं मानसिक खच्चीकरण करण्यासाठी मला वर्षभरापासून त्रास दिला जातो आहे. मनिषा कायंदे यांनीही मला वर्षभर त्रास दिला आहे. आता विशाखा राऊत आणि रंजना नेवाळकर या दोघींनी त्यांची तूट भरुन काढत मला त्रास दिला आहे. माझं मानसिक खच्चीकरण करण्यात आलं आहे असा आरोप विशाखा बोडखेंनी केला आहे. माझी चार वर्षांची मेहनत आज व्यर्थ गेली आहे याचे दु:ख आहे, पक्षात पक्षप्रमुख व शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या शब्दाला काही किंमत न देता विशाखा राऊत व रंजना नेवाळकर आपला मनमानी कारभार करत आहे त्यामुळे मी पक्षाचा राजीनामा देत आहे… मनीषा कायंदे व मीना कांबळी यांनी बघितलेले स्वप्न विशाखा राऊत व रंजना नेवाळकर यांनी यशस्वी करून दाखवल्या बद्दल दोघींचे देखील अभिनंदन पुढे देखील शिवसेना भवनात बसुन असेच कार्य करत रहा, आशा करते रंजना नेवाळकर यांच्या हाताचा मटणाचा वास गेला असेलच… पुन्हा नागपुरात येवून सावजी वर ताव मारा व महाप्रसादाचे वाटप करा… अशा शब्दांत शिल्पा बोडखे यांनी उद्धव ठाकरे गटातील महिला नेत्यांवर टीकास्त्र डागलं आहे.
शिल्पा बोडखे यांच्या पत्रामध्ये नेमकं काय ?
आपण शिवेनेच्या पूर्व महिला आघाडी संपर्क प्रमुख व प्रवक्ता या पदावर प्रामाणिकपणे काम करत संघटना वाढवण्याचा प्रयत्न केला. पण शिवसेना भवनात बसून विशाखा राऊत आणि रंजना नेवाळकर यांनी सतत षडयंत्र रचून वारंवार संघटन विस्कळीत करण्याचा प्रयत्न केला असे मला वाटतं.
शिवसेना पक्षात शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा आणि शिवसेना नेते आदित् ठाकरे यांच्या शब्दाला किंमत आहे, पण आता मला कळाले की येथे विशाखा राऊत आणि रंजना नेवाळकर यांच्याकडे पक्षाचे पूर्ण अधिकार दिले असून पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शब्दाला देखील त्या जुमानत नाहीत.
मी पक्षाचे अहोरात्र प्रामाणिकपणे काम करत राहिले आणि विशाखा राऊत आणि रंजना नेवाळकर या शिवसेना भवनात बसून षडयंत्र रचत बसल्या. मला सोशल मीडियाचे काम करायचे नाही असं पत्र मी आदित्य ठाकरे यांना पाठवले, परंतु विशाखा राऊत यांना मी काम करून नये आणि त्रस्त होऊन राजीनामा द्यावा असं वाटत आहे.