
"कोल्हापूर-सातारा राष्ट्रीय महामार्गावरील भुयारी मार्गांची कामे वेगाने पूर्ण करा, अन्यथा...", शिवेंद्रसिंह राजे भोसले यांचे निर्देश
मुंबई : कोल्हापूर व सातारा भागात लवकरच ऊस गाळप हंगाम सुरू होणार आहे. कारखान्यांना ऊस नेण्यासाठी कोल्हापूर सातारा राष्ट्रीय महामार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. त्यामुळे या मार्गावर वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी या महामार्गावरील भुयारी मार्गांची व सेवा रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिले.
कोल्हापूर सातारा राष्ट्रीय महामार्गाच्या कामांचा आढावा व कराड येथील वाहतूक कोंडीसंदर्भात आज सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी या सूचना केल्या.तसेच कोल्हापूर व सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक हे दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी झाले होते. शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले की, कोल्हापूर सातारा राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात कामे सुरू आहेत. भुयारी मार्ग व सेवा रस्त्यांच्या कामांमुळे या मार्गावर वाहतूक कोंडी होते. ही कोंडी टाळण्यासाठी कामांना वेग देण्याच्या सूचना कंत्राटदारांना द्याव्यात. तसेच ऊस गाळप हंगामात या महामार्गावरच ऊस वाहतूक करणाऱ्या बैलगाडी, ट्रॅक्टरची वाहतूक मोठ्या प्रमाणात होणार आहे. त्यामुळेही वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या मार्गावरील स्लिप रस्ते, कामे सुरू असलेल्या रस्त्यांवरील वळण मार्गावरील कामे पूर्ण करून तो रस्ता वाहतुकीस योग्य करावा. तसेच भुयारी मार्गाजवळील पर्यायी रस्ते सुस्थितीत करण्यात यावीत. जेणेकरून या ठिकाणी वाहतूक कोंडी होणार नाही.
वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी पोलीस व जिल्हा प्रशासनाने नियोजन करावे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 वर वाहतूक कोंडी होणाऱ्या ठिकाणी क्रेनची व्यवस्था ठेवण्यात यावी. तसेच या ठिकाणी ट्रॅफिक वॉर्डन नेमण्यात येऊन त्यांची सेवा कोल्हापूर व सातारा पोलिसांच्या अखत्यारित देण्यात यावी, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. भुयारी मार्गाची कामे जलदगतीने पूर्ण करण्यास कंत्राटदारांना सांगण्यात आले आहेत. तसेच ज्या ठिकाणी वाहतूक कोंडी होते तेथे ट्रॅफिक वॉर्डन पुरविण्यात येतील. तसेच वळण रस्त्यांच्या ठिकाणचा रस्ता सुव्यवस्थित करण्यात येईल. कराडमधील रस्त्याचे काम दीड महिन्यात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असल्याचे राष्ट्रीय महामार्गाचे अभियंता श्रीवास्तव यांनी सांगितले.