फोटो सौजन्य - Social Media
Buldhana News : जिल्ह्यात यंदा मान्सूनचे आगमन उशिरा झाल्याने जून महिना संपत आला तरी अपेक्षित पावसाची नोंद झालेली नाही. अपुऱ्या पावसामुळे पाणीटंचाईची तीव्रता कायम असून खरीप हंगामातील पेरण्यांचाही वेग मंदावला आहे. पावसाअभावी शेतकरी आणि नागरिक दोघांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे.
शनिवारी सकाळपर्यंत जिल्ह्यात सरासरी ७४ मिमी पावसाची नोंद झाली असून, हे जिल्ह्याच्या सरासरी वार्षिक पर्जन्यमानाच्या अवघ्या ९.७१ टक्के आहे. मोताळा तालुक्यात ९४ मिमी (१३.२५ टक्के), जळगाव जामोदमध्ये ९५ मिमी (१३.४६ टक्के), मेहकरमध्ये ९४.५ मिमी (११.२७ टक्के), बुलढाण्यात ८६.४ मिमी (१०.०४ टक्के), नांदुरात ७५.४ मिमी (१०.१० टक्के) आणि शेगावमध्ये ६९.९ मिमी (१०.२४ टक्के) पावसाची नोंद झाली आहे. इतर तालुक्यांतील स्थितीही समाधानकारक नसल्याचे चित्र आहे.
यंदा जिल्ह्यात सुमारे साडेसात लाख हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरण्यांचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, पुरेसा पाऊस न झाल्याने लाखो हेक्टरवरील पेरण्या अद्याप रखडल्या आहेत. काही शेतकऱ्यांनी झालेल्या तुरळक पावसावर विश्वास ठेवून पेरण्या सुरू केल्या असल्या, तरी पावसाचा खंड पडल्यास पिकांवर संकट ओढवण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, शेतीच्या कामांना सुरुवात झाल्यामुळे ग्रामीण भागात मजुरांची मागणी वाढली आहे. त्यामुळे मजुरीचे दर वाढले असून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतील (मनरेगा) मजुरांची संख्या लक्षणीयरीत्या घटली आहे. जूनच्या पूर्वार्धात सुमारे २१ हजार मजूर मनरेगावर कार्यरत होते. सध्या ही संख्या १३ ते १४ हजारांपर्यंत घसरली आहे.
जिल्ह्यातील पाणीटंचाई अद्याप गंभीरच आहे. सध्या ४८ गावांमध्ये ५२ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून १ लाख १५ हजार ५४७ नागरिकांची तहान टँकरच्या माध्यमातून भागवली जात आहे. तसेच २५२ गावांमध्ये २८४ अधिग्रहित खासगी विहिरींमधून पाणीपुरवठा सुरू आहे. येत्या काही दिवसांत दमदार पाऊस झाला नाही, तर पाणीटंचाई अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.
अपुऱ्या पावसाचा परिणाम जिल्ह्यातील ५१ लहान-मोठ्या धरणांवरही झाला आहे. संततधार पाऊस आणि नदी-नाल्यांना पूर न आल्याने धरणांतील जलसाठ्यात अपेक्षित वाढ झालेली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील जलसाठ्याची स्थिती चिंताजनक असून सर्वांच्या नजरा आता दमदार पावसाकडे लागल्या आहेत.






