सातारा : सार्वत्रिक लोकसभा निवडणूक-2024 अंतर्गत सातारा लोकसभा मतदारसंघात नामनिर्देशन अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवसापर्यंत पाच उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. त्यामुळे लोकसभा मतदारसंघाकरिता आता 16 उमेदवारांमध्ये लढत होणार असल्याचं चित्र स्पष्ट झाले आहे.
दरम्यान या निवडणूकीत थेट लढत महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले विरूध्द महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्यातच होणार आहे.
शनिवारी उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया पार पडली. छाननीमध्ये तीन उमेदवारी अर्ज अवैध ठरले. त्यामुळे 21 उमेदवारांचे अर्ज निवडणुकीसाठी पात्र ठरले होते. पाच उमेदवारांनी अंतिम दिवसाअखेर अर्ज माघारी घेतले आहेत. दरम्यान माघारी प्रक्रियेनंतर सर्व उमेदवारांना निवडणुक चिन्हांचे वाटप करण्यात आले.
उमेदवार आणि त्यांना मिळालेले चिन्ह :
आनंद रमेश थोरवडे(बहुजन समाज पार्टी) चिन्ह-हत्ती, उदयनराजे प्रतापसिंह महाराज भोसले (भारतीय जनता पक्ष) चिन्ह-कमळ, शशिकांत जयवंतराव शिंदे (राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष) चिन्ह-तुतारी वाजवणारा माणूस, प्रशांत रघुनाथ कदम (वंचित बहुजन आघाडी) चिन्ह- प्रेशर कुकर, तुषार विजय मोतलिंग (बहुजन मुक्ति पार्टी) चिन्ह-खाट, सयाजी गणपत वाघमारे (बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी) चिन्ह-शिट्टी, डॉ. अभिजीत वामनराव आवाडे-बिचुकले (अपक्ष) चिन्ह-कपाट, सुरेशराव दिनकर कोरडे (अपक्ष) चिन्ह-ऑटो रिक्षा, संजय कोंडीबा गाडे (अपक्ष) चिन्ह-तुतारी, निवृत्ती केरु शिंदे (अपक्ष) चिन्ह-चालण्याची काठी, प्रतिभा शेलार (अपक्ष) चिन्ह-गॅस सिलिंडर, सदाशिव साहेबराव बागल (अपक्ष) चिन्ह-दूरदर्शन, मारुती धोंडीराम जानकर (अपक्ष) चिन्ह-हिरा, विश्वजीत पाटील-उंडाळकर (अपक्ष) चिन्ह-बॅट, सचिन सुभाष महाजन (अपक्ष) चिन्ह-फुगा, सीमा सुनिल पोतदार (अपक्ष) चिन्ह-बॅटरी टॉर्च.
नोटा पर्यायासाठी दुसरी ईव्हीएम मशीन
दरम्यान, एका ईव्हीएम मशीनवर 15 उमेदवार व एक नोटा असे 16 नावांची मर्यादा असल्याने फक्त नोटा या पर्यायासाठी दुसरी ईव्हीएम मशीन मतदान केंद्रावर वाढली आहे. त्यामुळे प्रत्येक मतदान केंद्रावर दोन ईव्हीएम मशीन लागणार आहेत. त्या दृष्टीने प्रशासनाने मायक्रो प्लॅन करुन चोख तयारी केली असून ७ मे रोजी होणाऱ्या मतदान प्रक्रियेसाठी सर्व यंत्रणा सज्ज असेल असे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी सांगितले.
कोणी घेतली माघार ?
शनिवारी विठ्ठल सखाराम कदम (अपक्ष) यांनी अर्ज माघार घेतला होता. तर सोमवारी दादासाहेब वसंतराव ओव्हाळ (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए)), दिलीप हरिभाऊ बर्गे (भारतीय जवान किसान पार्टी), सागर शरद भिसे (अपक्ष) आणि चंद्रकांत जानू कांबळे (अपक्ष) या चार जणांनी उमेदवारी अर्ज माघार घेतले.