
गिरीष महाजन हटाव', सुपीक जमिनी वाचवण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा
कुंभमेळ्यात होणारी गर्दी लक्षात घेता ६६.५ किलोमिटरचे रिंग रोड तयार केले जाणार आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून भुसंपादन प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. मात्र या रिंगरोडमुळे सुपीक जमिनी, घरे, व्यवसायीक दुकाने बाधित होणार आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी रिंगरोडला तीव्र विरोध होत आहे. मोजणीस गेलेल्या अधिकाऱ्यांनी महिला व शेतकऱ्यांना मारहाण केल्याच्या घटना देखील समोर आल्या आहे. या मारहाणी घटनांमुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष आहे.
Farmer Protest : ‘जखमेवर मीठ’ की मदतीचा हात? कांद्याच्या दरावरून शेतकऱ्यांचा संताप, आंदोलनाचा इशारा
शुक्रवारी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी मातोरी व मुंगसरा या दोन गावांना प्रत्यक भेट देऊन रिंग रोडमुळे बाधीत होणाऱ्या क्षेत्राची पाहणी केली होती. या वेळी शेतकऱ्यांनी प्रस्तावित रिंगरोडचा मार्ग बदलण्याची मागणी करून प्रशासनाला दुसरे चार पर्यायी मार्ग सुचविले.
शेतकऱ्यांनी सुचविलेले हे पर्यायी मार्ग तांत्रिकदृष्ट्या चुकीचे असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी रविवारी (दि. १७) जमीन अधिग्रहणाच्या विरोधात एकत्र येत विल्होळी येथील के. केशवराव थोरात ग्रामसंस्कार सभागृहात बैठक घेतली. यावेळी छावा क्रांतीवीर सेनेचे अध्यक्ष करण गायकर, साहेबराव दातीर, अॅड. कैलास खांडबळे, कामगार नेते विक्रम नागरे यांच्यासह मातोरी, मुंगसरा, आंबे, राजूर बहुला, पारदेवीसह २० गावांतील बाधित शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कुंभमेळा मंत्री हे घटनाबाहा पद वापरून प्रशासनावर दबाव आणला जात असल्याचे शेतकऱ्यांनी बैठकीत सांगितले, मंत्री महाजनांचा हस्तक्षेप थांबला नाही तर त्यांच्या पदालाच न्यायालयात खेचू असा ठरावही बैठकीत मंजूर करण्यात आला. कुंभमेळ्याचे कारण देत जमिनी अधिग्रहित करण्यासाठीच महाजन यांनी जिल्हाधिकारी प्रसाद यांची विशेष नियुक्ती केल्याचा गंभीर आरोप शेतकऱ्यांनी केला.
सोमवार (दि. १८) रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील आंदोलनानंतर मुंगसरात मोजणीदरम्यान अधिकारी पोलिसांच्या मारहाणीत जखमी झालेल्या ८० वर्षीय आजीच्या दारात तीन तासांचे ‘आत्मक्लेश आंदोलन’ करण्यात येणार आहे. त्यानतर पुढील जनआंदोलनाची रणनीती जाहीर केली जाणार आहे.