
सोलापूर महापालिकेत नालेसफाई घोटाळ्यावरून रणकंदन! (Photo Credit- X)
मागील सर्वसाधारण सभेत नालेसफाईतील कथित अनियमिततेचे पुरावे सभागृहात सादर करण्यात आल्यानंतर महापौरांनी चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार महापालिका आयुक्तांनी चौकशी समिती नेमून १५ दिवसांत अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र मुदत संपूनही चौकशीची समाधानकारक प्रगती झालेली नसल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर संशय निर्माण होत असल्याचे जाधव यांनी म्हटले.
नगरअभियंत्यांवरील चौकशीप्रकरणी कोणाचा दबाव आहे का, असा सवाल उपस्थित करत त्यांनी चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित नगरअभियंत्यांनी नैतिकतेच्या आधारावर पदापासून दूर राहावे, अशी मागणी केली. “चौकशीत ते निर्दोष ठरल्यास मी जाहीर माफी मागण्यास तयार आहे; मात्र तोपर्यंत नैतिकतेचे पालन व्हावे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, चौकशी समितीच्या अध्यक्षा तथा अतिरिक्त आयुक्त विना पवार यांची भेट घेतल्यानंतर चौकशीसाठी आवश्यक मनुष्यबळ व वेळ अपुरा पडत असल्याची माहिती समोर आल्याचे जाधव यांनी सांगितले. त्यामुळे आवश्यक असल्यास मुदतवाढ घेऊन चौकशी पूर्ण करावी; मात्र संपूर्ण प्रक्रिया लेखी स्वरूपात आणि पारदर्शकपणे पार पाडावी, अशी मागणी त्यांनी केली.
महापालिका आयुक्तांनी दिलेली मुदत संपल्यानंतरही चौकशीची नेमकी स्थिती जाहीर करण्यात आलेली नाही. यावरून प्रशासन या प्रकरणात गंभीर नसल्याचे दिसून येत असल्याचा आरोप जाधव यांनी केला. “नगरअभियंत्यांचे इतके वजन आहे का की आयुक्तही हतबल झाले आहेत? काही दबाव असेल तर तो स्पष्ट करावा. चौकशीत किती लाखांचा अपहार झाला, हे नंतर समोर येईल; मात्र अद्याप चौकशीलाच गती मिळालेली नाही,” अशी टीकाही त्यांनी केली.
या प्रकरणाची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनाही दिल्याचे जाधव यांनी सांगितले. भ्रष्टाचार करणाऱ्या कोणत्याही अधिकाऱ्याला सरकारचा पाठींबा राहणार नाही, अशी भूमिका पालकमंत्र्यांनी व्यक्त केल्याचा दावा त्यांनी केला. दोषींवर कठोर कारवाई होईपर्यंत हा पाठपुरावा सुरूच राहील, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
Solapur News : शिवरत्न हटवून ‘भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी सभागृह’; जिल्हा परिषदेत ठराव मंजूर