शिवरत्न हटवून 'भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी सभागृह'; जिल्हा परिषदेत ठराव मंजूर
सोलापूर : जिल्हा परिषद सोलापूरच्या स्थायी समितीच्या बैठकीत जिल्हा परिषदेच्या ‘शिवरत्न सभागृह’ या नावातील ‘शिवरत्न’ शब्द हटवून सभागृहाला ‘भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी सभागृह’ असे नामकरण करण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. अध्यक्ष दीपक वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांनी हा ठराव सभागृहापुढे मांडला.
बैठकीत जिल्हा परिषदेमार्फत सुरू असलेल्या विविध विकासकामांचा आढावा घेण्यात आला. विकासकामांची गुणवत्ता, निधीचा योग्य व पारदर्शक वापर तसेच योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचावा, यासाठी संबंधित विभागांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या. विभागांमध्ये प्रभावी समन्वय राखण्याचे निर्देशही देण्यात आले. बैठकीच्या प्रारंभी माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाबद्दल दोन मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर २५ जून रोजी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीचे कार्यवृत्त कायम करण्यात आले. शासनाकडून प्राप्त महत्त्वपूर्ण परिपत्रके व शासन निर्णयांची नोंदही बैठकीत घेण्यात आली.
बैठकीस उपाध्यक्ष तथा अर्थ व बांधकाम समिती सभापती इंद्रजीत पवार, शिक्षण व आरोग्य समिती सभापती चेतनसिंह केदार, कृषी, पशुसंवर्धन व दुग्धशाळा समिती सभापती रामप्पा चिवडशेट्टी, महिला व बालकल्याण समिती सभापती अमृता वाघे, समाजकल्याण समिती सभापती संस्कृती सातपुते, समिती सदस्य पृथ्वीराज माने, आदिनाथ देशमुख, रश्मी बागल, बालाजी नरुटे, रमेश भांजे, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) तथा सदस्य सचिव सूर्यकांत भुजबळ, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मीनाक्षी वाकडे यांच्यासह सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.
जिल्ह्यातील ‘शिवरत्न’ या नावाला राज्यभरात वेगळी ओळख आहे. ही ओळख राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यापासून सर्व स्तरांवरील लोकांना आहे. सभागृहाचे नाव बदलून ही ओळख पुसण्याचा प्रयत्न होत असल्याचे दिसते. मात्र, नाव बदलले म्हणून त्याची ओळख कधीही पुसली जाणार नाही.
भाजपच्या नेत्यांचे लक्ष माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, सुधाकरपंत परिचारक आणि गणपतराव देशमुख यांनी उभारलेल्या संस्था व त्यांच्या नामकरणावर असल्याचे दिसून येते. जिल्हा परिषदेत एखादे नवे सभागृह उभारून त्याला भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव दिले असते, तर त्याचे सर्वांनी स्वागत केले असते. स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्याबद्दल आम्हाला मनापासून आदर आहे. त्यांच्या शब्दांत सांगायचे तर, ‘छोटे मन से कोई बड़ा नहीं होता, टूटे मन से कोई खड़ा नहीं होता.’ मराठीत सांगायचे तर, छोट्या मनाच्या माणसाला कधीही मोठेपण मिळत नाही. हे भाजपच्या लोकांनी लक्षात घ्यावे.
– प्रशांत बाबर






