
Sonu Sood adopts Masalechaudhari village in Maharashtra, Sonu Sood adopts village, Sonu Sood, Sonu sood Charity foundation,
सोलापूर, शहर प्रतिनिधी: चित्रपटांचे यश, पुरस्कार आणि बॉक्स ऑफिसचे आकडे महत्त्वाचे असले तरी एखाद्या सामान्य माणसाची आशा बनण्यात जे समाधान मिळते, ते कोणत्याही यशापेक्षा मोठे असते, अशी भावना अभिनेता व समाजसेवक सोनू सूद यांनी व्यक्त केली.
सोलापूरातील पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ‘सोनू सूद चॅरिटी फाउंडेशन’, ‘उन्नती’ उपक्रम, सामाजिक कार्य, ग्रामीण विकास, शिक्षण, आरोग्य आणि राजकारणातील प्रवेशाबाबत मनमोकळेपणाने भूमिका मांडली.कोविड काळात मजुरांना घरी पोहोचवण्यापासून सुरू झालेला प्रवास आज शिक्षण, वैद्यकीय मदत, रोजगारनिर्मिती आणि ग्रामीण विकासापर्यंत पोहोचल्याचे सांगताना सोनू सूद म्हणाले, ही लढाई एकट्याने जिंकता येत नाही. पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि सर्वसामान्य लोकांच्या सहकार्यामुळेच हजारो लोकांपर्यंत मदत पोहोचवणे शक्य झाले.
यावेळी त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील ‘उन्नती’ प्रकल्पाची माहिती दिली. मोहोळ तालुक्यातील मसलेचौधरी गाव दत्तक घेतल्याचे सांगत, त्या गावात रस्ते, ड्रेनेज, वीज, शौचालये, आरोग्य आणि शिक्षण सुविधा उभारण्यावर भर दिला जाणार असल्याचे स्पष्ट केले. ग्रामीण शाळांमधील मूलभूत सुविधांचा प्रश्न गंभीर असल्याचे नमूद करताना ते म्हणाले, अनेक शाळांमध्ये मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह नसते. अशा छोट्या पण महत्त्वाच्या समस्यांवर काम करण्याची गरज आहे. सोलापूर आणि परिसरातील गरजू शाळांची माहिती दिल्यास मदतीचा प्रयत्न करू असे त्यांनी सांगितले.
शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांच्या मुलांच्या शिक्षणासाठीही फाउंडेशन कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले. एका मुलाला शिक्षण दिल्यास त्याच्या पुढील पिढ्यांचे भविष्य बदलू शकते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.आपण सर्वांनी मिळून काम केले, तर पुढील दहा वर्षांत हजारो लोकांचे आयुष्य बदलू शकतो, असा आशावाद व्यक्त केला.
या पत्रकार परिषदेस चित्रकार विपुल मिरजकर, रूपल पांडे , मानसी, राहुल बऱ्हाणपूरकर आदी उपस्थित होते.
बस चालक-कर्मचाऱ्यांच्या आरोग्यासाठी MSRTC-HNCII पुढे; कर्करोग तपासणी आणि जनजागृती अभियान
राजकारणात प्रवेशाबाबत विचारलेल्या प्रश्नावर सोनू सूद यांनी सध्या तरी कोणताही राजकीय विचार नसल्याचे स्पष्ट केले. राज्यसभेसह अनेक मोठ्या ऑफर्स आल्या मात्र सध्या समाजकार्यातून लोकांशी जोडलेले राहणे मला अधिक महत्त्वाचे वाटते, असे ते म्हणाले.सरकारसोबत सामाजिक प्रकल्पांमध्ये सहकार्य करण्यास आपण तयार असल्याचे सांगताना सोनू सूद म्हणाले, सरकारी यंत्रणांसोबत समन्वय साधून अनेक ठिकाणी शाळा आणि सुविधा उभारण्याचे काम केले आहे. सहकार्याने मोठे बदल घडवता येऊ शकतात.
मोकाट कुत्र्यांच्या प्रश्नावर बोलताना त्यांनी शेल्टर होमची गरज आहे. प्रश्न सोडवण्यासाठी केवळ महापालिका किंवा सरकारवर अवलंबून न राहता नागरिकांनीही सहभाग घेतला पाहिजे,असे त्यांनी नमूद केले.