फोटो सौजन्य - Social Media
चिखली तालुक्यातील Amdapur येथील इंदिरानगर परिसरात एका शेतातील उभ्या गव्हाच्या पिकाला अचानक आग लागून मोठे नुकसान झाल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. या आगीत सुमारे एक हेक्टर क्षेत्रातील गहू पिकासह शेतातील स्प्रिंकलर संच आणि पाईप जळून खाक झाले असून शेतकरी कृष्णा राम हिंगे यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अमडापूर येथील शेतकरी कृष्णा राम हिंगे यांची इंदिरानगर परिसरातील भाग क्रमांक १ मधील गट क्रमांक १००२ मध्ये सुमारे एक हेक्टर शेती आहे. या शेतात त्यांनी गहू पिकाची लागवड केली होती. पिक चांगल्या अवस्थेत असताना बुधवारी दुपारच्या सुमारास अचानक गव्हाच्या शेतातून धूर निघू लागल्याचे परिसरातील नागरिकांच्या लक्षात आले. काही क्षणांतच आगीने मोठे रूप धारण केले आणि संपूर्ण शेतातील गहू पिकाला वेढा घातला. उन्हाची पंचांच्या उपस्थितीत जळालेल्या शेतीचा पंचनामातीव्रता आणि कोरडी पिके असल्यामुळे आग वेगाने पसरली. त्यामुळे काही वेळातच जवळपास एक हेक्टर क्षेत्रातील गहू पिक जळून खाक झाले. याचबरोबर शेतात बसवलेला स्प्रिंकलर संच तसेच पाईपलाइनही आगीत जळून नष्ट झाली. त्यामुळे शेतकरी हिंगे यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी उष्णतेमुळे किंवा इतर कारणांमुळे ही घटना घडल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, परिसरातील नागरिकांनी वेळीच सतर्कता दाखवत आग विझविण्याचा प्रयत्न केल्यामुळे मोठा अनर्थ टळला. नागरिकांनी पाणी आणि माती टाकून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या प्रयत्नांमुळे आग इतर शेतांपर्यंत पसरण्यापासून रोखण्यात यश आले. अन्यथा शेजारील शेतांमधील पिकांनाही मोठे नुकसान होण्याची भीती होती. घटनेची माहिती मिळताच संबंधित प्रशासनानेही घटनास्थळी धाव घेतली. अमडापूर पोलीस ठाण्याचे बिट अंमलदार शिवाजी बिलगे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यांनी परिसरातील परिस्थितीची माहिती घेतली आणि पुढील कारवाई सुरू केली. यावेळी महसूल विभागाचे अधिकारीही घटनास्थळी उपस्थित होते.
या घटनेनंतर महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी पंचांच्या उपस्थितीत जळालेल्या शेतीचा पंचनामा केला. भाग क्रमांक २ चे तलाठी मोरे, तहसील कर्मचारी ज्ञानू आदबाने तसेच गजानन चोपडे, रवी पाखरे, संदीप नगरे, सविता पाखरे, उषा हिंगे आणि रघुनाथ लोखंडे यांच्यासह इतर पंचांच्या उपस्थितीत नुकसानाची नोंद करण्यात आली. जळालेल्या पिकासह शेतातील साहित्याचेही निरीक्षण करण्यात आले. या आगीत शेतकरी कृष्णा राम हिंगे यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. गहू कापणीच्या टप्प्यावर असताना ही घटना घडल्यामुळे त्यांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई मिळावी यासाठी त्यांनी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे नुकसानभरपाईची मागणी केली आहे. प्रशासनानेही पंचनाम्याच्या आधारे पुढील प्रक्रिया सुरू केली असल्याची माहिती मिळाली आहे.
दरम्यान, उन्हाळ्याच्या दिवसांत शेतांमध्ये उभ्या पिकांना आग लागण्याच्या घटना वाढण्याची शक्यता असते. कोरडे वातावरण, तीव्र उष्णता आणि कधी कधी मानवी दुर्लक्ष यामुळे अशा घटना घडतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी तसेच नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्येही चिंता व्यक्त केली जात आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत शेतातील पिकांची योग्य काळजी घेणे, विजेच्या तारांपासून किंवा इतर संभाव्य धोक्यांपासून पिकांचे संरक्षण करणे तसेच आगीसारख्या आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी आवश्यक उपाययोजना ठेवणे गरजेचे असल्याचेही सांगण्यात येत आहे.






