
उड्डाणपुलासाठी १०८ कोटींचे भरीव बळ! मुलुंड पूर्व ते द्रुतगती महामार्गावरील कोंडी फोडण्यासाठी महानगरपालिकेचा निर्णय
मुलुंड पूर्व आणि नीलम नगरमधील रहिवाशांचा दक्षिण मुंबईच्या दिशेने होणारा प्रवास अधिक वेगवान करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने पावले उचलली आहेत. या भागातील चालकांना महामार्गावर जाण्यासाठी घ्यावा लागणारा ३ किलोमीटरचा कोंडीचा वळसा आणि ऑक्ट्रॉय नाक्यावरील अपघातांचा धोका कायमचा टाळण्यासाठी पालिकेने थेट एलिव्हेटेड पूर्व द्रुतगती महामार्गाला जोडणाऱ्या एका नवीन उड्डाणपुलाची निविदा प्रसिद्ध केली आहे. प्रतापराव गुजर मार्ग ते एलिव्हेटेड महामार्गाला जोडणाऱ्या या ७८० मीटर लांबीच्या पुलासाठी अंदाजे १०८.२३ कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. २०२६ च्या अखेरपर्यंत याचे बांधकाम सुरू होण्याची शक्यता आहे. तर हे काम पुढील २४ महिन्यांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.(फोटो सौजन्य – AI)
सध्या मुलुंड पूर्व आणि नीलम नगरमधील रहिवाशांना दक्षिण मुंबईकडे जाण्यासाठी गव्हाणपाडा सार्वजनिक उद्यानापासून डावे वळण घ्यावे लागते आणि त्यानंतर ऑक्ट्रॉय नाक्याजवळ यू-टर्न घ्यावा लागतो. या संपूर्ण प्रक्रियेमुळे वाहनचालकांना तब्बल ३ किलोमीटरचा अतिरिक्त वळसा घालावा लागतो. कार्यालयात जाण्याच्या घाईच्या वेळी या भागात प्रचंड वाहतूक कोंडी होत असल्याने नोकरदारांना रोज मनस्ताप सहन करावा लागतो. तसेच, ऑक्ट्रॉय नाक्यावरून यू-टर्न घेणे केवळ वेळखाऊ नसून अत्यंत धोकादायकही बनले आहे. पूर्व द्रुतगती महामार्गावरून वेगाने येणाऱ्या वाहनांना येथील सिग्नलमुळे अचानक थांबावे लागत असल्याने हा परिसर अपघातप्रवण क्षेत्र बनला आहे.
सिग्नलमुळे पूर्व द्रुतगती महामार्ग, नवघर जंक्शन आणि ऑक्ट्रॉय नाक्याजवळ वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. या समस्येवर तोडगा म्हणून नीलम नगरमधील प्रतापराव गुजर मार्ग ते एलिव्हेटेड पूर्व द्रुतगती महामार्गादरम्यान (आनंद नगर ते साकेत) ७८० मीटर लांबीचा उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. एका दिशेने प्रवास करण्यासाठी या पुलावर ६.५ मीटर रुंदीच्या दोन मार्गिका असतील. हा उड्डाणपूल थेट मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाद्वारे उभारल्या जाणाऱ्या एलिव्हेटेड पूर्व द्रुतगती महामार्गाला जोडला जाणार असल्याने, दक्षिण मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना थेट आणि विनाअडथळा मार्ग उपलब्ध होणार आहे.
NCP Politics: पार्थ दादांचे राजकीय करिअर संपवण्याचा कट…! राष्ट्रवादीत लेटरबॉम्ब
या प्रकल्पाबाबत माहिती देताना पालिकेच्या पूल विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, ऑक्ट्रॉय नाक्यावरील यू-टर्नमुळे केवळ वाहतुकीचा खोळंबा होत नाही, तर वेगाने येणाऱ्या वाहनांमुळे अपघातांचा मोठा धोका निर्माण होतो. हा सिग्नल महामार्गाच्या मोकळ्या प्रवासात अडथळा ठरत असून, यामुळे नवघर जंक्शन आणि परिसरात मोठी कोंडी होते. हा नवीन उड्डाणपूल या सर्व समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढणारा असून यामुळे मुंबई-ठाण्यातील प्रवास अधिक सुकर होणार आहे.