ठाणे/ स्नेहा जाधव,काकडे : जन्मजात हातापायाची बोट चिकटल्यावर भविष्यात त्याचा त्रास होण्याचा संभव असतो. वेळेत शस्त्रक्रिया करणे महत्वाचे असले तरी चिकटलेल्या बोटांची शस्त्रक्रिया करून त्यांची प्लॅस्टिक सर्जरी करणे खर्चिक असते. परंतु सर्वसामान्यांसाठी अशी शस्त्रक्रिया आता सिव्हिल रुग्णालयात होत असून, रुग्णालयात भिवंडीतील एका चिमुकलीच्या यशस्वी प्लॅस्टिक सर्जरीनंतर तिच्या डाव्या हाताची दोन चिकटलेली बोटं आता स्वतंत्रपणे हालचाल करू लागणार आहेत.
भिवंडी परिसरात राहणारी अंजू (नाव बदलले आहे) ही मुलगी सहा वर्षांची असून तिच्या दोन्ही हाताची मधले आणि बाजूच बोटं आणि पायाची करंगळी आणि बाजूचे बोट जन्मतःच चिकटलेली होती. त्यामुळे ती लेखन, खेळ, वस्तू उचलणे यासारख्या मूलभूत हालचालीही अडथळा ठरत होती . तिच्या या स्थितीमुळे आईवडील चिंतेत होते, पण उपचारांचा खर्च परवडत नव्हता. अशा जन्मजात दोषांवर वेळेवर शस्त्रक्रिया करणे अत्यावश्यक असते. अंजूच्या पालकांनी ठाण्यातील सिव्हिल रुग्णालयाचा पर्याय निवडला. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार अतिरिक्त जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. धीरज महांगडे, यांच्या मार्गदर्शनाखाली अंजूच्या डाव्या हातावर नुकतीच यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आल्याची माहिती प्लॅस्टिक सर्जन डॉ.अभिषेक धाकड यांनी दिली.
साधारण एक तासांच्या सर्जरीनंतर मधले व बाजूचे चिकटलेले बोटं वेगळी करण्यात यश आले आहे. मुलीच्या हाताची हालचाल सुधारण्यास सुरुवात झाली आहे. डॉक्टरांनी सांगितले की, पुढील काळात योग्य फिजिओथेरपी आणि काळजी घेतल्यास ती बोटं पूर्णतः कार्यक्षम होतील. या शस्त्रक्रियेसाठी वरिष्ठ सर्जन डॉ. निशिकांत रोकडे, प्लॅस्टिक सर्जन डॉ. अभिषेक धाकड, भूल तज्ज्ञ डॉ. प्रियांका महांगडे, प्रीती पगारे, भक्ती प्रिठे आदींनीअथक परिश्रम घेतले.
सामान्यतः अशा प्लॅस्टिक सर्जरी खासगी रुग्णालयांमध्ये मोठा खर्च येतो. त्यामुळे अनेक गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबे अशा उपचारांपासून वंचित राहतात. पण आता स सिव्हिल रुग्णालयांमध्येही अशा जटिल व खर्चिक सर्जरी मोफत होऊ लागल्यामुळे गरजू रुग्णांना मोठा दिलासा मिळत आहे. याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक ठाणे डॉ. कैलास पवार यांनी सांगितलं आहे.