ठाणे/स्नेहा जाधव,काकडे : येत्या मंगळवारी ठाण्यातील काही भागात पाणी कपात होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. शहाड येथील अशुध्द जल उदंचन केंद्रावर मीटर बदलण्याचे काम व शहाड येथील अशुध्द जल उदंचन केंद्र येथे होत असलेली पाईपलाईन गळती बंद करणे व इतर आवश्यक कामे महावितरण कंपनीमार्फत करण्यात येणार आहे. सदरचे काम 24 तासांचा शटडाऊन घेऊन करण्यात येणार असल्याने ठाणे महानगरपालिकेला प्राधिकरणाकडून होणारा पाणी पुरवठा मंगळवार दिनांक 22 जुलै रोजी सकाळी 9.00 ते बुधवार दिनांक 23जुलै रोजी सकाळी 9.00 वा. पर्यत बंद राहणार आहे. तथापि ठाणे महानगरपालिकेच्या स्वतःच्या पाणी पुरवठा योजनेचे नियोजन करुन टप्या टप्प्याने ठाणे शहरात एक वेळ पाणी पुरवठा सुरु ठेवण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे.
या अनुषंगाने घोडबंदर रोड, पातलीपाडा, बाळकुम, ब्रम्हांड, पवारनगर, कोठारी कम्पाउंड, डोंगरीपाडा, वाघबीळ, इत्यादी ठिकाणाचा पाणी पुरवठा मंगळवार दि .22 जुलैपासून सकाळी 9.00 ते रात्री 9.00 वाजे पर्यंत बंद राहील व समतानगर, ऋतुपार्क, सिध्देश्वर, इंटरनिटी, जॉन्सन, जेल, साकेत, उथळसर, रेतीबंदर, कळव्याच्या व मुंब्राचा काही भाग मंगळवार दि. 22 जुलै रोजी रात्री 9.00 ते सकाळी 9.00 वा. पर्यंत बंद राहील. अश्या रीतीने टप्या टप्प्याने एक वेळ पाणी पुरवठा सुरु ठेवण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे.वरील शटडाऊन मुळे पाणी पुरवठा पूर्व पदावर येईपर्यंत पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करुन ठेवावा व ठाणे महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन पाणीपुरवठा विभागामार्फत करण्यात आले आहे.