
मिरा-भाईंदरमध्ये गुणरत्न सदावर्ते यांची नरेंद्र मेहता यांच्याशी अचानक भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मिरा-भाईंदर : ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी आज मिरा-भाईंदर येथील भाजप कार्यालयात येऊन भाजप आमदार नरेंद्र मेहता यांची भेट घेतली. या अचानक झालेल्या भेटीमुळे स्थानिक राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.
राज्यात १ तारखेपासून रिक्षा आणि टॅक्सी चालकांशी संबंधित धोरणांवरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर ही भेट विशेष महत्त्वाची मानली जात आहे. मराठी रिक्षा-टॅक्सी चालकांच्या मुद्द्यावरून सदावर्ते यांनी आक्रमक भूमिका घेतली असून, या विरोधात त्यांनी मोर्चाचे नेतृत्वही केले आहे. विशेष म्हणजे, सदावर्ते यांनी वारंवार परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या धोरणांवर टीका केली आहे. त्यामुळे त्यांच्या या भेटीकडे राजकीय दृष्टिकोनातून पाहिले जात आहे. मेहता आणि सदावर्ते यांच्यात नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नसली तरी, रिक्षा-टॅक्सी धोरण, स्थानिक प्रश्न आणि आगामी राजकीय समीकरणांवर चर्चा झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या भेटीमुळे मिरा-भाईंदर परिसरात राजकीय घडामोडींना वेग येण्याची चिन्हे दिसत असून, येत्या काळात याचे पडसाद उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Maval News : सरकारी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अन् शासकीय कार्यालयाला टाळं; मावळात कामकाज ठप्प
भाई्दर पूर्वेच्या ऑटो रिक्षा युनियनच्या पदाधिकाऱ्यांसोबत आयोजित बैठकीदरम्यान आज वातावरण तणावपूर्ण झाले. डॉ. अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडत असताना मनसे कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत विरोध दर्शविला. ज्योती पार्क, इंद्रलोक कॉर्नर जवळ, न्यू गोल्डन नेस्ट येथे आज दुपारी १ वाजण्याच्या सुमारास ही बैठक आयोजित करण्यात आली होती. कार्यक्रम सुरू असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने घटनास्थळी दाखल झाले आणि सदावर्ते यांच्या विरोधात घोषणाबाजी करत वातावरण तापवले.
स्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ नये यासाठी पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत आंदोलक मनसे सैनिकांना ताब्यात घेतले. या कारवाईनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, पोलिसांच्या बंदोबस्तामुळे परिस्थिती लवकरच नियंत्रणात आली. दरम्यान, या बैठकीत ऑटो रिक्षा चालकांच्या विविध समस्यांवर चर्चा होणार असल्याचे सांगण्यात आले होते. या घटनेमुळे भाईंदर परिसरात राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे.