
रस्त्याच्या भरावामुळे नाल्याचा प्रवाह अडला? इंदिरा नगरमध्ये घर-दुकानांत घुसले घाण पाणी; मनसे आक्रमक
इंदिरा नगर परिसरातील नाल्याचे पाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण झाल्याने ते रस्त्यावर साचत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नसल्याने हे दूषित पाणी परिसरातील घरांमध्ये आणि दुकानांमध्ये शिरत आहे. त्यामुळे घरगुती साहित्य, दुकानांमधील माल आणि इतर वस्तूंचे नुकसान झाल्याचे नागरिकांनी सांगितले. स्थानिक रहिवासी मंगेश कचरे यांच्या घरात आणि दुकानातही नाल्याचे पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले. घाण आणि दुर्गंधीयुक्त पाणी घरात शिरल्यामुळे आर्थिक नुकसानीबरोबरच नागरिकांचे दैनंदिन जीवनही विस्कळीत झाले आहे.
Buldhana News: परतीच्या पावसाची पिकांना आशा, सोयाबीन, उडीद, मुगाचे पीक गेले; आता कपाशी तुरीवर भिस्त
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, परिसरात करण्यात आलेल्या रस्त्याच्या कामादरम्यान टाकलेल्या भरावामुळे नाल्यातील पाण्याचा प्रवाह बाधित झाला. पूर्वी नाल्यातून वाहून जाणारे पाणी आता रस्त्यावर येत असल्याचा त्यांचा आरोप आहे. रस्त्याचे काम करताना पावसाचे आणि सांडपाण्याचे योग्य नियोजन करण्यात आले होते का, नाल्याच्या प्रवाहाचा विचार करण्यात आला होता का आणि पाण्याच्या निचऱ्यासाठी पुरेशी व्यवस्था का करण्यात आली नाही, असे प्रश्न या घटनेनंतर उपस्थित होत आहेत.
या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ॲड. अविनाश पांडुरंग शिळकंदे आणि दिलीप राठोड यांनी इंदिरा नगर परिसराला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. नाल्यातील पाणी रस्त्यावर कशाप्रकारे येत आहे आणि त्यामुळे स्थानिकांच्या घरांचे तसेच दुकानांचे किती नुकसान होत आहे, याची त्यांनी माहिती घेतली. पाहणीनंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी संबंधित महापालिका अधिकाऱ्यांशी चर्चा केली. नाल्याचा प्रवाह रस्त्याच्या कामामुळे अडला असेल तर तो तातडीने पूर्ववत करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली.
केवळ तात्पुरत्या स्वरूपात पाणी काढून प्रश्न मिटवण्याऐवजी नाल्याचा प्रवाह पूर्णपणे मोकळा करून पाण्याचा योग्य निचरा होईल, अशी कायमस्वरूपी व्यवस्था करावी, अशी मागणी मनसेकडून करण्यात आली आहे. नाल्याचे पाणी पुन्हा रस्त्यावर येणार नाही तसेच नागरिकांच्या घरांमध्ये आणि दुकानांमध्ये शिरणार नाही, यासाठी केडीएमसी प्रशासनाने तातडीने आवश्यक कामे हाती घ्यावीत, अशी मागणी करण्यात आली.
नागरिकांच्या घरात आणि दुकानांमध्ये नाल्याचे घाण पाणी शिरत असताना प्रशासन आणखी किती काळ शांत बसणार, असा सवालही उपस्थित करण्यात आला आहे. विकासकामे करताना नागरिकांना नव्या समस्यांचा सामना करावा लागत असेल तर संबंधित कामाचे नियोजन आणि त्यासाठी जबाबदार असलेल्या यंत्रणेची जबाबदारी निश्चित करणे आवश्यक असल्याचे मनसे पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
या समस्येबाबत वारंवार तक्रारी करूनही कायमस्वरूपी तोडगा निघत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे मनसेने आता महापालिका प्रशासनाला आंदोलनाचा इशारा दिला आहे. इंदिरा नगर परिसरातील नाल्याचा प्रवाह तातडीने मोकळा करून नागरिकांना दिलासा द्यावा. समस्या लवकरात लवकर सोडवली नाही, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून मोठे जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा ॲड. अविनाश शिळकंदे आणि दिलीप राठोड यांनी दिला आहे.
या प्रकारामुळे इंदिरा नगरमधील नालेसफाई, रस्त्याच्या कामाचे नियोजन आणि पाणी निचरा व्यवस्थेबाबत केडीएमसीच्या कारभारावर प्रश्न उपस्थित झाले आहेत. आता महापालिका प्रशासन या समस्येवर कोणती उपाययोजना करते आणि नागरिकांना कधी दिलासा मिळतो, याकडे स्थानिकांचे लक्ष लागले आहे.
अंगारकी संकष्टीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत ट्रॅफिक अलर्ट; वरळीसह दादरमधील वाहतुकीत बदल